▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬
▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬
═════════════ @ संकलन @
*श्री. गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य
═════════════
🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎
══════════════════════
📕 *कुत्रा चावल्यास माणूस पिसाळतो, हे खरे आहे काय ?* 📕
***********************************
कुत्रा चावल्यास माणसाला जखम होते. ती जखम इतर जखमांप्रमाणेच औषधोपचाराने चार-पाच दिवसांत चरी होते. कुत्रा चावल्यास माणूस पिसाळतो, हा समज चुकीचा आहे. मात्र आपल्याला चावलेला कुत्रा जर पिसाळलेला असेल, (म्हणजे त्याला रेबीज वा पिसाळी हा रोग झालेला असेल) तर मात्र आपल्याला धोका असतो.
पिसाळी हा रोग सामान्यपणे कुत्रा, मांजर, कोल्हा, लांडगा अशा मांसभक्षक प्राण्यांना होतो. जंगलातील प्राण्यांना झालेला रोग ते मानवी वस्त्यांतील पाळीव प्राण्यांपर्यंत पोचवतात. नंतर कुत्रा वा मांजर असे पाळीव प्राणी आपल्याला चावल्याने हा रोग आपल्यालाही होतो. म्हणजे हा प्राण्यांचा आजार चुकून वा अपघाताने आपल्याला होतो.
पिसाळी हा रोग व्हॅन्डोव्हायरस या विषाणूमुळे होतो. दंशाच्या जागेपासून हे विषाणू प्रथम स्नायूपेशींमध्ये वाढतात व नंतर चेतातंतूंमधून मेंदूपर्यंत पोचतात. नंतर हे विषाणू शरीरभर पसरतात. लाळेतही हे जंतू येतात. लाळेत हे विषाणू असले तर असा प्राणी मानवाला चावल्यास मानवात पिसाळी हा रोग होऊ शकतो. येथे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, पिसाळी रोग झालेला कुत्रा वा मांजर, विषाणू त्याच्या शरीरात शिरल्यापासून फक्त दहा दिवसच जिवंत राहू शकतात. त्यामुळे आपल्याला चावलेला कुत्रा चावल्याच्या दिवसापासून दहा दिवसांनंतर जिवंत राहिला, तर तो पिसाळलेला नव्हता हे सिद्ध होते व त्यामुळे आपल्यालाही रोग होण्याची भीती नसते.
पिसाळलेला कुत्रा चावल्यास, त्याची लाळ जखमेला लागल्यास किंवा पिसाळलेल्या म्हशीचे दूध न उकळता पिल्यास आपल्याला पिसाळी रोग होण्याची शक्यता असते. विषाणू दंशाच्या ठिकाणापासून हळूहळू मेंदूपर्यंत पोचतात. यात मेंदूच्या पेशी अतिशय जास्त प्रमाणात उत्तेजित होतात. त्यामुळे आवाज, हवेची झुळूक अशा साध्या उत्तेजनांनीही व्यक्तीला झटके येतात. खूप घाम येतो, लाळ सुटते, डोळ्यांतून खूप पाणी येते, व्यक्ती चिडचिडी होते, पटकन चिडते. मानेचे व घशाचे स्नायू आखडल्यामुळे व्यक्तीला पाणी वा पातळ पदार्थ पिता येत नाहीत. पाण्याच्या नुसत्या आवाजानेही झटके येतात. म्हणून या रोगाला हायड्रोफोबिया (पाण्याची भीती वाटणारा रोग) असे म्हणतात. हा रोग माणसाला हमखास मारतो. आजवर जगात केवळ ३ रुग्ण वाचू शकले आहेत. या रोगात वर सांगितलेल्या कारणांमुळे माणूस कासावीस होतो, वेडापिसा होतो, पिसाळल्यासारखे करतो; पण एक लक्षात ठेवा, कुत्रे पिसाळलेले नसतात. चांगले कुत्रे चावल्यास काहीही धोका नसतो व पिसाळलेले कुत्रे चावल्यानंतरही रोगप्रतिबंधक लस घेतल्यास रोग टाळता येतो व आपण सुरक्षित राहू शकतो.
*डॉ. जगन्नाथ दीक्षित*
*डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून
स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज
═══════════════════════
अग्निपंख शैक्षणिक समुह महाराष्ट्र राज्य
▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा