═════════════
@ संकलन:गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र
═════════════
🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎
══════════════════════
📙 *क्षयरोग (टीबी) म्हणजे काय ?*
*तो बरा होतो का ?* 📙
क्षयरोग वा टीबी म्हटलं म्हणजे अजूनही काही जणांना भीती वाटत असेल. सुदैवाने आज क्षयरोग हा तेवढा भयंकर रोग राहिलेला नाही. १९४० पर्यंत क्षयरोगावर पुरेशी औषधे उपलब्ध नसल्याने हा रोग असाध्य असाच होता. माधवराव पेशवे हे क्षयरोगाने वारले. पंडित नेहरूंची पत्नी देखील क्षयरोगाने वारली. यावरून त्या काळातील क्षयरोगाची भयानकता लक्षात येईल. आज मात्र तो खात्रीने बरा होतो.
मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोसिस नावाच्या जंतूमुळे हा रोग होतो. हा रोग सामान्यतः फुप्फुसांना होतो. शरीरातील लिम्फग्रंथी मेंदू, मणके, हाडे, त्वचा, आतडे, यकृत अशा इतर अवयवांनाही क्षयरोग होऊ शकतो. फुप्फुसाचा क्षयरोग खूप महत्त्वाचा, यासाठी की तो एकापासून दुसऱ्याला होऊ शकतो. भारतात दर हजार लोकसंख्येमागे क्षयाचे चार ते पाच रोगी सांसर्गिक अर्थात रोग प्रसार करणारे असतात. क्षयरोगाच्या बेडक्यात क्षयाचे जंतू असतात. थुंकताना, खोकताना, बोलताना ते हवेत सोडले जातात. निरोगी व्यक्तीच्या श्वासाबरोबर हे जंतू फुप्फुसात प्रवेश करून त्या व्यक्तीला क्षयरोग होतो. शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीवरच हा रोग होणे वा न होणे अवलंबून असते. क्षयाच्या रुग्णात खोकला व बेडका कधी कधी बेडक्यात रक्त पडणे, ताप येणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, दम लागणे, रात्री घाम येणे ही लक्षणे दिसून येतात. बेडक्याच्या तपासणीद्वारे या रोगाचे खात्रीने निदान होऊ शकते. काही वेळा क्ष-किरण तपासणी व रक्ताची तपासणी करतात.
क्षयरोगाचे निदान झाल्यानंतर तात्काळ उपचार सुरू केल्यास क्षयरोग सहा महिन्यांत बरा होतो. कधी कधी नऊ ते बारा महिने उपचार घ्यावे लागतात. क्षयरोगाची आपल्या देशातील कारणे पाहिल्यास त्याचे मूळ आपल्याला दारिद्र्य व पर्यावरण अस्वच्छतेत सापडेल. त्यामुळे जोपर्यंत देशाची आर्थिक व सामाजिक परिस्थिती सुधारणार नाही तोपर्यंत क्षयरोगावर कायम स्वरूपी तोडगा निघणे अशक्यच आहे.
क्षयरोगाच्या प्रतिबंधासाठी लहान मुलांना बीसीजीची (क्षयरोग प्रतिबंध लस) लस देणे, पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ खोकला, बेडका, ताप असलेल्या रुग्णांच्या बेडक्याची तपासणी करून तात्काळ उपचार सुरू करणे; रुग्णांने खोकताना तोंडावर रुमाल ठेवणे, इतस्तः बेडके न टाकणे; हे उपाय करणे आवश्यक ठरते.
एड्स झालेल्या ७०% व्यक्तींना क्षयरोगाची लक्षणे दिसतात. त्यामुळे एड्सच्या वाढत्या प्रसाराबरोबर क्षयरोगही वाढत जाण्याची शक्यता आहे. क्षयरोग प्रतिबंध व एड्स प्रतिबंधाचे उपाय यासाठीच एकत्रितपणे राबवले के गेले पाहिजे. दरवर्षी देशात साडेसहा लाख लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी व्यक्ती, समाज व देश अशी सर्वच पातळ्यांवर भरीव प्रयत्न होणे गरजेचे आहे.
*डॉ. जगन्नाथ दीक्षित*
*डाॅ. अंजली दीक्षित*
यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून
स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज
═════════════
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा