रविवार, २६ सप्टेंबर, २०२१

शिक्षक

 *☄शिक्षक !*

      *हे वाचताना डोळे भरून येतील*

              *🔥कर्तव्य🔥*

       बाजारातल्या कोपऱ्यात बसून गजू आपलं नेहमीचं चपला-बुट शिवण्याचं काम करत होता.कुणाची तरी चाहूल लागली म्हणून त्याने आपली मान वर केली.

"अरे ही चप्पल शिवायची आहे"

     समोरची व्यक्ती त्याला ओळखीची वाटली.

"तुम्ही गायकवाड सर ना?"

त्याने विचारलं.

"हो.तू?"

      "मी गजानन.गजानन लोखंडे.झेड.पी.च्या शाळेत दहावी ब च्या वर्गात होतो बघा.तुम्ही आम्हांला इंग्रजी आणि इतिहास शिकवायचे."

      "बरोबर.पण तुझा चेहरा ओळखू येत नाहीये" गायकवाड सर त्याला निरखत म्हणाले.

      "असू द्या सर.मी कुणी हुशार विद्यार्थी नव्हतो की तुमच्या लक्षात राहीन"

"पण तू हा व्यवसाय का.....?"

       "सर हा आमचा पिढीजात व्यवसाय!आजोबा,वडील दोघंही हेच करायचे.दहावी सुटलो.तेव्हापासून वडिलांची तब्येत ठीक नाहीये.त्यामुळे शिक्षण सोडून गेली तीन वर्षे हेच करतोय."

"काय झालं वडिलांना?

       "सतत दारु पिऊन त्यांचं लिव्हर खराब झालंय.त्यामुळे ते नेहमी आजारीच असतात"

"ओह!आणि तुझे भाऊ?"

"दोन भाऊ आणि एक बहीण तिघंही लहान आहेत.शिकताहेत.आई अशिक्षित."

      "अच्छा" गायकवाड सर विचारात गढून गेले.गजूनं त्यांची चप्पल शिवून दिल्यावर तो नाही नाही म्हणत असतांनाही त्याच्या हातात दहा रुपये कोंबून निघून गेले.

      काही दिवसांनी ते परत आले.गजूला म्हणाले "अरे माझ्या मापाचा एक बुट तयार करुन देशील?"

       गजू तयार झाला.त्याने माप घेऊन दोन दिवसात तयार बुट करुन दिला.सरांना तो आवडला.त्यांनी गजू नाही म्हणत असतानाही पाचशे रुपये दिले.गजूला खुप आनंद झाला.इतके पैसे त्याला आजपर्यंत मिळाले नव्हते.


       आता त्याच्याकडे नियमितपणे चपला बुट बनवण्यासाठी ग्राहक येऊ लागले.सगळे गायकवाड सरांनी पाठवलंय असं सांगायचे.

        काही दिवसांनी सर आले.गजू त्यांना ग्राहक पाठविल्याबद्दल धन्यवाद देऊ लागला.त्यांनी त्याला थांबवलं. म्हणाले "गजू तुझ्या हातात कला आहे.तू असं का करत नाहीस इथंच एक टपरी टाकून त्यात वेगवेगळ्या साईजचे डझनभर चपलाबुट ठेवले तर गिर्हाईकांना थांबावं लागणार नाही"

       " सर कल्पना चांगली आहे पण त्याला दहा पंधरा हजार लागतील.तेवढे पैसे नाहीयेत माझ्याजवळ"

"हरकत नाही.मी देतो तुला.पण मला तू ते सहा महिन्यात परत करायचे.चालेल?"

        गजू तयार झाला.आठवड्यातच तो बसायचा तिथं टपरी उभी राहीली.महिन्याभरातच गजूचे पंधरा हजार वसूल होऊन दहा हजार नफाही हातात पडला. गायकवाड सर आल्यावर त्याने त्यांना पंधरा हजार दिले.त्यांनी ते त्याला परत केले.

      "मी तुला सहा महिन्यांची मुदत दिली होती.सहा महिन्यानंतरच मला परत कर.तोपर्यंत तुझा धंदा वाढवण्यासाठी त्याचा उपयोग कर."


         गजूचा आता उत्साह वाढला.त्याने जास्त माल ठेवायला सुरवात केली.उत्तम दर्जा आणि कमी किमतीमुळे त्याच्या टपरीवर खुप गर्दी व्हायला लागली.आता त्याला वेळ पुरेनासा झाला.

       सहा महिन्यांनी सर आले.गजूच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास फुलून आला होता.

      "सर खुप चांगलं चाललंय.पण आता पुढं काय करायचं"

      "गजू आता चांगल्या मार्केटमध्ये दुकान भाड्याने घ्यायचं.तिथे हे सगळं शिफ्ट करायचं.मी पाहून ठेवलंय दुकान.अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे.आणि हो!स्माँल स्केल इंडस्ट्रीसाठी जे कर्ज मिळतं ते तुला मिळवून देतो.एम.आय.डी.सी.मध्ये फँक्टरी टाकून दे"

      "काय?फँक्टरी?"गजू थरारला"सर मला जमेल का?"

        "सगळं जमेल.मी आहे ना"सर त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले.

      गजूने खाली वाकून त्यांचे पाय धरले.

"सर खुप करताय माझ्यासाठी"

       "अरे ते माझं कर्तव्यच आहे"त्याला उठवत ते म्हणाले"माझे बाकीचे विद्यार्थी परदेशात नोकऱ्या करताहेत.कोणी इथे मोठे अधिकारी आहेत.तूच एकटा मागे रहावा हे मला कसं पटावं?"गजूच्या डोळ्यात पाणी आलं.


       दोन वर्षात गजू खुप पुढे गेला.फँक्टरी वाढली.एकाची तीन दुकानं झाली.गजूचा गजानन शेठ झाला.झोपडपट्टीतून तो थ्री बी.एच.के.फ्लँटमध्ये रहायला गेला.भाऊबहीणी चांगल्या शाळाकाँलेजमध्ये जाऊ लागले.दरम्यान त्याचे वडील वारले.वडील गेल्यावर एका वर्षाने त्याचं लग्न झालं.मुलगी पसंत करायला तो गायकवाड सरांनाच घेऊन गेला होता.काही दिवसांनी त्याची आई वारली.

      इकडे गायकवाड सरांना निव्रुत्त होऊन पाच वर्षे झाली होती.सर आता थंकले होते.त्यांच्या मुलाने इंग्लंड मध्येच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता.मुलगी अगोदरच आँस्ट्रेलियात स्थायिक होती.त्यामुळे सर दुःखी होते.त्यात त्यांच्या पत्नीची तब्येतही आजकाल ठीक नसायची.


        एक दिवस सरांची पत्नी गेल्याचा संदेश गजूला मिळाला.सर्व कामं सोडून तो त्यांच्या घरी धावला.सरांची मुलगा,मुलगी वेळेवर पोहचू शकले नाहीत.ते येण्या अगोदरच अंत्यविधी पार पाडावा लागला.पण गजूने सरांना कोणतीच कमतरता तर जाणवू दिली नाहीच शिवाय तेराव्या दिवसापर्यंतचा सगळा खर्चही त्यानेच केला.

      सगळं आटोपल्यावर सरांच्या मुलाने त्यांना इंग्लंडला चलायचा खुप आग्रह केला पण सरांनी मायदेश सोडायला साफ नकार दिला.सगळे निघून गेल्यावर सरांचं एकाकीपण सुरु झालं ते गजूला बघवत नव्हतं पण त्याचाही नाईलाज होता.


       एक दिवस बायकोला घेऊन तो सरांच्या घरी पोहचला.त्याला पाहून सरांना आश्चर्य वाटलं.

" सर तुमचे माझ्यावर खुप उपकार आहेत.आज मला अजून एक मदत कराल.?"

" अरे आता तुला मदतीची काय गरज?तू आता खुप मोठा झालाय.बरं ठिक आहे सांग तुला काय मदत हवी आहे?"

"सर माझे वडील व्हाल?"

सर स्तब्ध झाले.मग म्हणाले"अरे वेड्या मी तर तुला कधीचंच आपला मुलगा मानलंय"

     "तर मग मला मुलाचं कर्तव्य करु द्या.मी तुम्हाला माझ्या घरी न्यायला आलोय.तुमचं उरलेलं आयुष्य तिथंच काढावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे"गजू हात जोडत म्हणाला.

"अरे पण तुझ्या बायकोला विचारलं का?"

"सर तिला विचारुनच मी हा निर्णय घेतलाय.तिलाही वडील नाहीयेत.तुमच्यासारखे सासरे वडील म्हणून मिळाले तर तिलाही हवेच आहेत.शिवाय पुढे मुलं झाल्यावर त्यांनाही आजोबा हवेतच की!"

"बघ बुवा.म्हातारपण फार वाईट असतं.मी आजारी पडलो तर तुलाच सर्व करावं लागेल.

"मुलगा म्हंटलं की ते सगळं करणं आलंच.सर तो सारासार विचार करुनच मी आलोय"

       सर विचारात पडले.मग म्हणाले "ठीक आहे येतो मी पण माझी एक अट आहे.मला तू सर म्हणायचं नाही"

       "मी माझ्या वडीलांना अण्णा म्हणायचो तुम्हालाही तेच म्हणेन"

सर मोकळेपणाने हसले.

"अजून एक अट.तुझ्यासारखे अनेक गजू आहेत ज्यांना मदतीची गरज आहे.त्यांना गजानन शेठ व्हायला मला मदत करायची"

😥गजूला गहिवरुन आलं .त्यानं सरांना मिठी मारली.दोघंही बराच वेळपर्यंत रडत होते.


 *🔥सत्य घटनेवर आधारीत...🔥*

                संकलीत.गजानन गोपेवाड 

 शिक्षक हा असाच असायला हवा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...