शुक्रवार, २ जुलै, २०२१

लावा बेसाल्ट दगडि खांब

 *वणी जवळ खोद्कामात आढळले लावा बेसाल्ट दगडी खांब* 

६ कोटी वर्षादरम्यानचे दुर्मिळ कोलमनार बेसाल्ट 

        आज दिनांक १ जुलै रोजी मी (रवींद्र खराबे) व मा.जयंत कर्णिक असे आम्ही दोघे वणी शिबला पांढरकवडा ह्या मार्गावरील पार्डी ह्या गावाजवळ खोदकामात आढळलेले दगडी खांब प्रत्यक्ष पहावयास गेलो. तेव्हा योगायोगाने चंद्रपूर येथील भूगर्भशास्त्रज्ञ मा. सुरेश चोपणे हे सुद्धा तेथे उपस्थित होते. तेव्हा त्यांनी या दगडांबाबत खालील प्रमाणे सविस्तर माहिती दिली.

ही कोणत्याही  ऐतिहासिक काळातील मानव निर्मित वस्तू नसून ६ कोटी वर्षापूर्वी महाराष्ट्रात प्रचंड ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्यातील लाव्हारसातून तयार झालेले कॉलमनार बेसाल्ट (Columnar Basalt) नावाचे दुर्मिळ नैसर्गिक खडक आहेत. लाव्हारस अचानक पाण्याच्या संपर्कात येवून थंड झाल्याने आकुंचन पावून षटकोनी आकाराचे खांब तयार होतात.

            यवतमाळ जिल्ह्यातील वणी परिसर हा जसा ऐतिहासिक दृष्ट्‍या प्राचीन आहे तसा तो भौगोलिक दृष्ट्‍यासुध्दा अतिप्राचीन आहे. ह्याच परिसरात २०० कोटी वर्षाची स्ट्रोमेटोलाईटची आणि पूर्वी पांढरकवडा जवळ आणि मारेगाव  तालुक्यात  ६ कोटी वर्षाची शंख-शिंपल्यांची जीवाश्मे मी (सुरेश चोपने) शोधली होती. झरी तालुक्यातील आता प्रकाशात आलेल्या ह्या अश्म खांबाची माहिती ५ वर्षापासून मला(सुरेश चोपने) होती. ७ कोटी वर्षापूर्वी पर्यंत विदर्भात समुद्र होता. परंतु ६ कोटी वर्षादरम्यान उत्तर क्रीटाशिअस ( late cretaceous) काळात पृथ्वीवर भौगोलिक घडामोडी घडल्या आणि आजच्या पश्चिम घाटातून भेगी उद्रेकाद्वारे तप्त लावारस यवतमाळ जिल्हा आणि मध्य विदर्भापर्यंत वाहत आला. ह्या उद्रेकातून तयार झालेल्या दगडी थरांना दक्खनचे पठार (Deccan Trap) या नावाने ओळखले जाते. हा लाव्हारस  मध्य भारतात पाच लाख स्क्वेअर किलोमीटर परिसरात पसरलेला असून पश्चीमेकडे याची जाडी तब्बल ६६०० फुट आहे.  

     भारतात कर्नाटकात सेंट मेरी बेट हे अश्याच कॉलमनार बेसाल्ट साठी पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे .  महाराष्ट्रांत मुंबई, कोल्हापूर, नांदेड येथे हे खडक आढळले असून आता त्यात यवतमाळ जिल्ह्याचे नाव समाविष्ट झाले आहे.विदर्भ प्रदेशात ह्या खडकाची जाडी कमी आहे त्यामुळे गेल्या हजारो वर्षापासून भूक्षरण होऊन प्राचीन खडक उघडे पडत असून त्यामुळे अनेक नव्या जीवाश्माचे संशोधन होऊ शकेल. वणी परिसरात  तेव्हा तप्त लाव्हारस वाहत (Flood Basalt) आला तेव्हा येथील नद्यात तो पडून अचानक थंड झाला त्यामुळे तो आकुंचन पावून त्याने  षटकोनी आकार घेतला आणि असे दगडी खांब तयार झाले,त्यांना कॉलमनार बेसाल्ट असे म्हणतात. इतर ठिकाणी तशी स्थिती नसल्याने तेथे तसे होऊ शकले नाही.अनेक ठिकाणी षटकोनी खांबांऐवजी पंचकोनी किंवा सप्तकोनी खांब सुध्दा आढळतात .हे खांब अगदी मानवाने ऐतिहासिक काळात मंदिरांच्या बांधकामासाठी तयार केले होते तसेच दिसतात.

      यवतमाळ जिल्ह्यात ६ कोटी वर्षापूर्वी डायनोसोर सारखे विशाल जीव आणि प्राणी वास करीत होते. घनदाट जंगले होती,परंतु महाराष्ट्रातील ह्या मोठ्या ज्वालामुखी उद्रेकामुळे सर्व जंगले ,जीव जंतू जळून राख झाले.जवळ जवळ ३०,००० वर्षे अधून मधून लाव्हारस वाहत येत असे.पुढे हा प्रलय थांबला आणि नव्याने सजीव सृष्टी निर्माण झाली. त्या काळात मानव नावाचा कुठलाही  प्राणी  विकसित झाला नव्हता. मानवाचा विकास केवळ ५० लाख वर्षानंतर झाला.   

    हे खडक भौगोलिक दृष्ट्या अतिशय महत्वाचे असून त्यांचे संरक्षण होणे व तो संपूर्ण परिसर सुशोभित होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...