शनिवार, २९ मे, २०२१

पल्स पोलोओ म्हणजे काय?

 ▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬

     

▬▬▬▬▬❚❂❚❂❚❚❂❚❂❚▬▬▬▬▬

══════════════════════

   *  संकलन  गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य *

  

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════

📙 *पल्स पोलिओ म्हणजे काय ?* 📙 


पोलिओ अर्थात बाल पक्षाघात हा सामान्यत: पाच वर्षांपेक्षा लहान वयाच्या मुलांना होणारा एक सांसर्गिक रोग आहे. तीन प्रकारच्या विषाणूंमुळे हा रोग होतो. हा विषाणू दूषित पाण्यामार्फत पसरतो. पोलिओच्या रुग्णाच्या विष्ठेचा पाण्याशी संपर्क येऊन ते दूषित होते. हेच पाणी निरोगी व्यक्ती प्यायल्यास तिला पोलिओ होऊ शकतो. 


पोलिओ हा रोग ९९% व्यक्तींमध्ये अत्यंत सौम्य स्वरूपाचा असतो. ९५% लोकांमध्ये तर कोणतीही विशिष्ट लक्षणे दिसत नाही. ३ ते ४% लोकांमध्ये ताप आढळून येतो. १% लोकांमध्ये मान व पाठ आखडणे, दुखणे अशी लक्षणे दिसतात. १% हून कमी रुग्णांमध्ये मात्र मज्जासंस्थेवर विषाणू आक्रमण करतो. याची परिणती एकतर श्वसन बंद पडून मृत्यू होण्यात किंवा हात पाय कायमस्वरूपी लुळे पडण्यामध्ये होते. 


पोलिओ हा गंभीर रोग असला तरी तो टाळणे सहज शक्य आहे. बाळाला जन्मल्यावर लगेच आणि त्यानंतर ते ६, १०,व १४ आठवडय़ांचे तसेच नंतर दीड वर्षांचे झाल्यावर पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन दोन थेंब पाजल्यास या रोगापासुन बाळाचे नक्कीच संरक्षण होऊ शकते. भारतात लसीकरणाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला गेल्याने या रोगाचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे.


 जागतिक आरोग्य संघटनेने २००५ पर्यंत पोलियोचे जगातून निर्मूलन करण्यासाठी धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. याला 'पल्स पोलिओ' असे म्हणतात. या कार्यक्रमाअंतर्गत विविध देशातील पाच वर्षांखालील बालकांना विशिष्ट दिवसांना पोलिओची लस दिली जाते. त्यामुळे सर्व बालकांच्या आतड्यांमध्ये लसीतील (रोग निर्माण करू न शकणारा) विषाणू प्रस्थापित होतो. साहजिकच रोगकारक विषाणूला राहण्यासाठी कोणत्याच बालकांचे आतडे मिळत नाही. परिणामी तो पर्यावरणात येतो व काही आठवड्यांनी नष्ट होतो. पल्स पोलिओ मोहीम यशस्वीपणे राबवली गेल्यास जगातून निर्मूलन होणारा देवी नंतरचा दुसरा रोग पोलिओ ठरेल यात शंका नाही. दुर्दैवाने काही व्यक्ती गैरसमजापोटी आपल्या बाळांना पोलिओची लस देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे त्यांच्या बालकांना पोलिओ होण्याचा धोका निर्माण तर झालाच आहे पण पोलिओ निर्मूलनाच्या अभियानालाही खीळ बसत आहे. म्हणूनच अमिताभ बच्चन तसेच शाहरुख खान सारखे लोकप्रिय अभिनेते तसेच सचिन तेंडुलकरसारखे महान खेळाडू सर्व जनतेला पल्स पोलिओच्या दिवशी सर्व बालकांना 'दो बूंद जिंदगी के' देण्याचे टीव्हीवरून आवाहन करताना दिसत असतात ! 

 

*डॉ. जगन्नाथ दीक्षित*

*डाॅ. अंजली दीक्षित*

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज'या पुस्तकातून


स्त्रोत- विज्ञान व दिनविशेष फेसबुक पेज

═══════════════════════

═══════════════════════


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...