बुधवार, ७ एप्रिल, २०२१

मेंदुतील लहरी

 🧠  *_मनोवेध_*  🧠

       

🎯 *_मेंदूतील लहरी_*

****************


_जागृती आणि निद्रेच्या चार स्थितींमध्ये मेंदूतील विद्युतलहरींत फरक दिसतो. मानवी मेंदूत अब्जावधी मेंदूपेशी (न्यूरॉन्स) असतात. एक मेंदूपेशी तिच्या असंख्य शाखांच्या माध्यमातून दुसऱ्या मेंदूपेशींशी जोडलेली असते. या पेशींमधून विद्युतधारा वाहत असते. मेंदूतील ही विद्युतधारा तपासता येते, तिची तरंगलांबी (वेव्हलेंग्थ) आणि वारंवारता (फ्रीक्वेन्सी) मोजता येतात, त्यांचा आलेख काढता येतो. त्यास ‘इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम (ईईजी)’ म्हणतात. या आलेखावरून मेंदूतील लहरींचे पाच प्रकार असतात असे लक्षात येते. हे प्रकार त्यांच्या वारंवारतेवरून केले जातात. डेल्टा, थीटा, अल्फा, बीटा आणि गॅमा अशी त्यांना नावे दिली आहेत._

     _त्यातील सर्वात संथ डेल्टा लहरी; त्यांचे प्रमाण आपण गाढ झोपलेलो असतो तेव्हा जास्त असते. त्यांची वारंवारता ० ते ४ हर्ट्झ (१ हर्ट्झ वारंवारता म्हणजे ती घटना दर सेकंदाला एकदा घडते.) असते. नवजात बालकांमध्ये याचे प्रमाण सर्वात जास्त असते, वय वाढते तसे ते कमी कमी होत जाते. अशा लहरी असलेली झोप माणसाला ताजेतवाने करते. या लहरींचे प्रमाण कमी असेल, तर त्या माणसाला शांत झोप लागत नसते. म्हणजे त्याच्या मेंदूला खरी विश्रांतीच मिळत नाही. मात्र जागेपणी यांचे प्रमाण जास्त असेल, तर ते मतिमंदत्वाचे लक्षण असू शकते. मेंदूला इजा झाली असल्यास याचे जागृतावस्थेतील प्रमाण वाढते._

     _डेल्टापेक्षा गतिमान लहरी म्हणजे थीटा त्यांची वारंवारता ४ ते ८ हर्ट्झ असते. या लहरी झोपेच्या दुसऱ्या टप्प्याच्या काळात अधिक असतात. जागृतावस्थेत या लहरी अधिक असतात, तेव्हा अंत:प्रेरणा किंवा आभास होण्याची शक्यता जास्त असते. संमोहित अवस्थेतही या लहरी जास्त असतात. या लहरींच्या काळात नवीन कल्पना सुचू शकतात. पण यांचे प्रमाण जास्त असेल तर औदासीन्य, नैराश्य वाढू शकते._

     _यापेक्षा अधिक गतिमान लहरी या ८ ते १२ हर्ट्झच्या असतात. त्यांना अल्फा लहरी म्हणतात. यापेक्षा वेगवान लहरी बीटा, त्यांची वारंवारता १२ ते ४० हर्ट्झ असते. जागे असताना या लहरी अधिक असतात. डिजिटल ईईजीचा शोध लागेपर्यंत गॅमा लहरी माणसाला माहीत नव्हत्या. जुन्या ईईजी तपासणीत २५ हर्ट्झपेक्षा अधिक वेगवान लहरी नोंदवता येत नसत. आधुनिक यंत्रांमुळे त्यांची नोंद शक्य झाली आहे. या लहरी गायक/नर्तक ‘फ्लो’मध्ये असतात, तेव्हा जास्त प्रमाणात असतात._



*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

 *_📡 जय विज्ञान 🔬_*

*_दैनिक लोकसत्ता,दिनांक-२९-जुन-२०२०_*

नवनिर्मिती ची प्रेरणा

 *_🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬_*

           🤔 *_कुतूहल_* 🤔


🎯 *_नवनिर्मितीची प्रेरणा_*

**********************


_गणितामध्ये कळीची नवनिर्मिती अनेकदा अंत:स्फूर्तीतून होते असे मानले जाते. मात्र अशी प्रेरणा आपल्या ताब्यात किंवा हुकमी नसल्यामुळे ती कशी आणि केव्हा जागृत होईल हे सांगणे अशक्यप्राय आहे. उदाहरणार्थ, थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन सांगत की, त्यांच्या स्वप्नात त्यांच्या कुलदेवतेच्या जिभेवरून खाली पडणारी गणिती सूत्रे त्यांना दिसत आणि जागे झाल्यावर ते ती लिहून त्यांची सिद्धता देण्याचा प्रयत्न करत. अर्थात, रामानुजन अलौकिक गणितज्ञ होते, निसर्गाचा जणू चमत्कार होते. कारण ती बहुतांश सूत्रे बरोबर आहेत हे सिद्ध झाले असले, तरी ती मुळात इतकी सखोल व अफलातून म्हणता येतील अशी असून अगदी प्रज्ञावंत गणितीलादेखील सुचणार नाहीत हे जगजाहीर आहे._

     _म्हणजेच केवळ तार्किक संरचना- जसे की, पूर्णांकांसाठी उपलब्ध प्रमेय किंवा उपपत्ती वास्तव संख्यांसाठी सिद्ध करणे असे व्यापैकीकरण (जनरलायझेशन), हे पथदर्शी नावीन्यपूर्ण गणित निर्माण करीलच असे नाही. अनेकदा संदिग्धताही महत्त्वाची भूमिका बजावते; म्हणजे निष्कर्ष सदोष किंवा सकृद्दर्शनी विसंगत असू शकतात. तरीदेखील अटकळी, विरोधाभास आणि काही वेळा तर्कहीन वाटणारी स्थिती यांचा मागोवा गणितात उल्लेखनीय भर घालू शकतो. गणितज्ञ असे आव्हानात्मक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. काही वेळा पूर्णपणे वा आंशिकपणे ते प्रश्न सोडवले जातात, तर बरेचदा त्याला दिलेल्या चौकटीत उत्तर नाही असा निष्कर्ष मिळू शकतो. उत्तर अस्तित्वात नाही अशा निष्कर्षांना गणितात अनन्यसाधारण महत्त्व आहे. याला कारण म्हणजे कुठला रस्ता घेऊ नका याचे मार्गदर्शन मिळते. तसेच चपखल नसले तरी, आसन्न (जवळचे) उत्तर मिळवण्यासाठी नवे तंत्र विकसित करण्यास चालना मिळते. वाहत्या मार्गात आलेल्या खडकामुळे जलप्रवाह काही वेळ थांबतो, पण नंतर त्याला वळसा घालून पुढे जातो. गणिताचेही काहीसे तसेच आहे._

     _गणित ही मानवनिर्मिती आहे, मात्र तिच्या मर्यादा ओलांडून विजयी होण्याचा प्रयत्न करणेही आपल्या हाती आहे. मुख्य म्हणजे, असा प्रयास कोणीही करू शकतो. त्यासाठी साधा कागद आणि पेन्सिल ही साधने पुरेशी आहेत. जोडीला गणकयंत्र आणि संगणक असेल तर उत्तम. निष्कर्षांचे व्यापैकीकरण या सरळसोट मार्गाशिवाय अन्य वाटांनी गणिताला पुढे नेण्याचे प्रयत्न आवश्यक आहेत. यासंदर्भात अद्याप सिद्धता न मिळालेल्या गणिती अटकळींनी सुरुवात करता येईल किंवा अशी कोडी- जी धन संख्यांसाठी गुंफली आहेत ती ऋण संख्यांसाठीही खरी आहेत का, हे तपासणसुद्धा चालेल! तर करायची ना सुरुवात?_



*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

 *_📡 जय विज्ञान 🔬_*

*_दैनिक लोकसत्ता,दिनांक- २२ फेब्रुवारी २०२१_*

समतोल आहार म्हणजे काय?

 *_आजची माहिती_*


*_📙 समतोल आहार म्हणजे काय ? 📙_*

**********************************

_आपला आहार समतोल असावा, चौरस असावा हा उपदेश ऐकून आपले कान किटले असतील. 'समतोल' म्हणजे काय हा प्रश्न आपल्याला पडणे स्वाभाविक आहे. समतोल आहार म्हणजे काय ? हे समजण्यासाठी प्रथम आहारात कोणते घटक असणे आवश्यक असते, हे आपण पाहू. कार्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे, क्षार, पाणी हे अन्नातील सहा प्रमुख घटक होत._

     _कार्बोदके शरीराला ऊर्जा पुरवितात. प्रथिने शरीराच्या जडणघडणीसाठी आवश्यक असतात. स्निग्ध पदार्थांपासून ऊर्जा मिळते, तसेच शरीराच्या महत्त्वाच्या क्रियाप्रक्रियांना मदत होते. अ, ब, क, ड, इ तसेच के ही जीवनसत्त्वे आपल्याला अत्यंत अल्प प्रमाणात लागतात. पण ती मिळाली नाही तर अनेक आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे सोडियम क्लोराइड सारखे हे क्षारही जगण्यासाठी आवश्यक असतात. पाणी हे तर साक्षात जीवनच ! शरीराच्या वचनांपैकी सुमारे ६४% वजन पाण्याचेच असते. हे सर्व घटक शरीराला योग्य प्रमाणात मिळाले नाही तर कुपोषण, रातांधळेपणा, मुडदूस, रोगप्रतिकारशक्तीचा अभाव, अशक्तपणा, गलगंड, रक्तक्षय इ. कमी पोषणामुळे होणारे आजार वा लठ्ठपणासारखे अतिपोषणामुळे होणारे आजार होऊ शकतात. हे टाळावयाचे असल्यास समतोल आहार घेणे आवश्यक ठरेल. ज्या आहारात वर वर्णन केलेले सर्व घटक योग्य प्रमाणात असतील त्यास समतोल आहार असे म्हणतात. योग्य प्रमाणात म्हणजे व्यक्तीला आवश्यक असलेली ऊर्जा त्यातून मिळाली पाहिजे. जीवनसत्वे, क्षार, पाणी मिळाले पाहिजे. खेरीज अनपेक्षित वा आकस्मित प्रसंगासाठी जसे आजार, अपघात यासाठी अतिरिक्त पोषणही त्याद्वारे मिळायला हवे. एकूण ऊर्जेपैकी ६५ ते ७०% कार्बोदकातून, १५ ते २५ % स्निग्ध पदार्थांतून तर ५ ते १५% प्रथिनांपासून मिळावी._

     _समतोल आहाराचा आपण अंगीकार केला तर निरोगी जीवनाकडे आपली वाटचाल सुरू राहील. आपण रोजचा आपला आहार बघितला तर ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, नाचणी अशा कार्बोदके अधिक असलेल्या अन्नपदार्थांसोबत डाळी, भाजीपाला, तेल, तूप या गोष्टी; तसेच मांस, मासे, दूध, अंडी असे प्राणीज पदार्थ आपण वापरात आणत असतो. हे सर्व अन्नपदार्थ वेगवेगळे परिपूर्ण नसतात. परंतु यातील दोन तीन पदार्थ एकत्र वापरले तर या मिश्रणाचे पोषणमूल्य वाढते. उदाहरणार्थ नुसत्या भाताऐवजी वरण-भात डाळ-तांदळाची खिचडी वरण-भाकरी इडली-सांबार इत्यादी पदार्थांमुळे आहार परिपूर्ण होतो_

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*

_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून_

तेल खावे की तुप?

 *_आजची माहिती_*


*_📒तेल खावे की तूप ?📒_*

***********************


_कोणाला तेल आवडते तर कोणाला तूप स्वयंपाकात तेल व तुप नसेल तर तो किती बेचव लागेल. पण पोषणाच्या दृष्टीने विचार केला तर तेल व तूप हे दोन स्निग्ध पदार्थाचेच प्रकार आहेत. सर्वसामान्य वातावरणात, तापमानात द्रवस्थितीत असणाऱ्या स्निग्ध पदार्थाला तेल; तर घनस्थितीत असणाऱ्या स्निग्ध पदार्थाला तूप असे म्हणतात._

     _स्निग्ध पदार्थ शरीराला ऊर्जा पुरविण्याचे कार्य करतात. शरीरातील हृदय, मूत्रपिंडासारख्या अवयवांचे हादर्‍यांपासुन रक्षण करण्याचे कार्यही मेदाच्या आवरणामुळे होते. १ ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून ९ किलोकॅलरी इतकी ऊर्जा मिळते. तेल व तूप या दोन मध्ये मूलभूत घटक म्हणजे मेदाम्ले (fat acid). तेलात असंपृक्त (Unsaturated) मेदाम्ले मोठ्या प्रमाणावर असतात. करडईच्या तेलात ७३ टक्के तर शेंगदाण्याच्या तेलात ३८ टक्के इतकी असंपृक्त मेदाम्ले असतात. याउलट वनस्पती वा गाईच्या तुपात असंपृक्त मेदाम्ले ५ टक्क्यांहूनही कमी असतात._

     _तेल व तूप खूप जास्त प्रमाणात खाल्ले तर लठ्ठपणाचा त्रास होईल. जेवणात ४० टक्क्यांहून अधिक ऊर्जा स्निग्ध पदार्थापासून मिळत असेल तर कालांतराने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. काही संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, जास्त स्निग्ध पदार्थ खाणाऱ्या लोकांमध्ये मोठ्या आतड्याचा व स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त आहे. संपृक्त मेदाम्ले असलेल्या स्निग्ध पदार्थांमुळे (तेलांमुळे) हृदयविकारांची शक्यता कमी होते. तसेच फ्रेनोडर्मा नावाचा त्वचारोगही होत नाही. त्यामुळे आहारात तुपा पेक्षा तेलच चांगले. आपल्याला लागणाऱ्या एकूण ऊर्जेच्या २० ते २५ टक्के ऊर्जा स्निग्ध पदार्थापासून मिळवायला काहीच हरकत नाही. मात्र त्यासाठी शक्यतो तेलच खावे. त्यातही करडई, सूर्यफूल वा सोयाबीनचे तेल चांगले._

     _"खाईन तर तुपाशी..."असे म्हणण्याऐवजी "खाईन तर तेलाशी..." असे म्हणायला पाहिजे. तीळ, मोहरी व शेंगदाणा तेल समप्रमाणात एकत्र करून ते वापरावे. हृदयरोग्यांसाठी ते हितकर आहे._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*

_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून_

उकळलेले पाणी बेचव का असते

 *_आजची माहिती_*


*_📙उकळलेले पाणी बेचव का लागते ?📙_*

************************************


_सर्दी झाली वा पोट खराब असेल तर उकळून गार केलेले कोमट पाणी तुम्ही प्यायला असाल. असे आणि बेचव लागते हे तुमच्या लक्षात आले असेल ! असे का बरे होत असावे ?_

     _पाण्याला त्याची चव त्यात विरघळलेल्या नायट्रोजनमुळे व क्षारांमुळे असते. त्यामुळे हापशाच्या पाण्याची चव, विहिरीच्या पाण्याची चव किंवा नदी, तळे, झरे, समुद्र यांच्या पाण्याची चव वेगवेगळी लागते. पाणी गरम केल्याने त्यातील विरघळलेले वायू वातावरणात निघून जातात व क्षार तळाशी गोळा होतात. अशा प्रकारे पाण्याला चव देणारे दोन्ही घटक नाहीसे झाल्याने पाणी बेचव लागते. त्यामुळेच असे पाणी प्यावे लागू नये, असेच सर्वांना वाटत असते. असे असले तरी वारंवार अामांश होणाऱ्या व्यक्तींनी उकळून गार केलेले पाणीच प्यावे. म्हणजे त्यांना आमांशाचा त्रास होणार नाही. हगवण लागलेल्या व्यक्तींनीही उकळलेले पाणी प्यावे. चवीपेक्षा सुरक्षितता जास्त महत्त्वाची असते, हे आपण समजून घ्यायला हवे._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन :गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*

_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून_

गणितोत्सव दिवस

 *_🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬_*


            🤔 *_कुतूहल_* 🤔


🎯 *_गणितोत्सव दिवस_*

********************


_नवीन वर्षांची दिनदर्शिका आली की त्यात आपले सण केव्हा आहेत हे आपण बघतो. त्याचप्रमाणे काही गणिती दिवसदेखील साजरे केले जातात. त्यातील निवडक आज पाहू._

     _अलौकिक गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा १२५ वा जन्मदिवस २२ डिसेंबर २०१२ रोजी साजरा करताना, तो दिवस भारताचा ‘राष्ट्रीय गणित दिवस’ म्हणून घोषित केला गेला. जेमतेम ३२ वर्षांच्या आयुष्यात तसेच प्रतिकूल आर्थिक आणि शारीरिक परिस्थितीत त्यांनी केलेले अचंबित करणारे गणिती कार्य आणि नि:स्पृह चरित्र अशा पैलूंवर त्या दिवशी युवा पिढीला प्रेरणा देणारी व्याख्याने, परिसंवाद असे कार्यक्रम देशभर घेतले जातात तसेच गणिती खेळ, कोडी व अनेक रंजक उपक्रमही आयोजित केले जातात_

     _भारतात २९ जून हा ‘राष्ट्रीय संख्याशास्त्र दिवस’ म्हणून मानला जातो. तो आहे प्रा. प्रसंताचंद्र महालनोबीस यांचा जन्मदिवस, ज्यांनी सुमारे १०० वर्षांपूर्वी संख्याशास्त्राचे शिक्षण, संशोधन आणि उपयोजन याचा पाया भारतात रचला. त्यांनी भारतीय सांख्यिकी संस्था (आयएसआय) स्थापना करून तिला जागतिक दर्जा मिळवून दिला. संयुक्त राष्ट्रांकडून दर पाच वर्षांनी एक संकल्पसूत्र घेऊन २० ऑक्टोबर रोजी ‘जागतिक संख्याशास्त्र दिवस’ साजरा केला जातो. त्याप्रमाणे २०१०, २०१५ आणि २०२० साली अनुक्रमे ‘शासकीय सांख्यिकी व्यवस्थेचे सुयश’, ‘सुव्यवस्थित आधारसामग्री, उच्चतर आयुष्य’ आणि ‘विश्वसनीय सांख्यिकी माहितीने जग जोडावे’ अशी संकल्पसूत्रे होती._

     _‘पाय’चे स्थूलमानाने मूल्य ३.१४ असे आहे. महिना/ दिवस/ वर्ष या तऱ्हेने दिनांक लिहिण्याच्या पद्धतीमुळे अमेरिकेत व इतर काही देशांत १४ मार्च हा ‘पाय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. आपण दिनांक दिवस/महिना/वर्ष असे लिहीत असल्यामुळे २२ जुलै हा आपला ‘पाय दिवस’ होऊ शकतो, कारण पायचे मूल्य स्थूलमानाने २२/७ असेही लिहिले जाते._

     _काही दिवस संख्यांच्या गणिती गुणधर्मामुळे साजरे होतात जसे की, फिबोनासी संख्यांचा क्रम १, १, २, ३, ५,.. असा आहे (मागच्या २ संख्यांची बेरीज करून नवीन संख्या मिळते) तरी त्यातील पहिल्या ४ संख्या अमेरिकेच्या महिना/दिवस दिनांक पद्धतीप्रमाणे ११/२३ म्हणजे २३ नोव्हेंबर हा ‘फिबोनासी दिवस’ निर्माण करतात. कधी कधी येणारा ‘पायथागोरस प्रमेय दिवस’ हा ‘अ२ + ब२ = क२’ सूत्रात बसणाऱ्या संख्यांनी निर्माण होतो. उदाहरणार्थ, दिनांक १५ ऑगस्ट २०१७; कारण १५२ + ८२ = १७२ किंवा १६ डिसेंबर २०२० (वर्षांचे शेवटचे दोन अंक). तेव्हा हे दिवस आणि ‘ई-दिवस’, ‘वर्गमूळ दिवस’ यांसारखे इतर गणिती दिवस शोधून साजरे करा._



*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

 *_📡 जय विज्ञान 🔬_*

*_दैनिक लोकसत्ता,दिनांक- ११ मार्च २०२१_*

मायक्रोफोन

 *_📗आजची माहिती 📗_*


*_🎤 मायक्रोफोन 🎤_*

****************** 

 

_माइक नसला, तर हल्ली प्रत्येक वक्त्याचे अडते. रेकॉर्डप्लेअरवर गाणे टेप करायचे असेल, तरी माईक लागतोच. टेलिफोनमध्ये ज्या बाजूला आपण बोलतो, त्या माऊथपीसमध्येही माईक असतोच. त्याचेच पूर्ण नाव मायक्रोफोन. या मायक्रोफोनमध्ये ध्वनीलहरींचे विद्युतलहरींत रूपांतर केले जाते. या लहरी मग जरुरीप्रमाणे अॅम्प्लीफायरकडे पाठवल्या जाऊन त्यांचे वर्धन केले जाते. वक्त्याचा रोजचा आवाज, साधे बोलणे मग पाहिजे तितक्या दूरवर, पाहिजे त्या लहान मोठ्या आवाजात ऐकवता येते. फोनवर बोलत असलो, तर हेच बोलणे जगाच्या पाठीवर दुसऱया फोनमध्ये कोठेही पाठवले जाऊ शकते. कॅसेटवर रेकॉर्ड करण्यासाठी माइकमधून आलेल्या विद्युतलहरींचाच उपयोग केला जातो._

     _मायक्रोफोनची रचना म्हणजे दोन पातळ धातुंच्या चकत्या एखाद्या सिलेंडरच्या तोंडाशी एकमेकांपासून अगदी थोडे अंतर ठेवून बसवलेल्या असतात. बाह्य चकती ही अगदी पातळ असून ध्वनिलहरींनी सहज कंप पावू शकणारी असते. तर आतील चकती जाड पण पक्की बसवलेली असते. यात मागील बाजूला एक छोटीशी बॅटरी असून तिच्यातून जाड चकतीवर सतत घनभार निर्माण केला जातो. जेव्हा ध्वनीलहरी बाह्य चकतीवर आदळतात व ती कंप पावते, तेव्हा तिच्यावर ऋणभार व आतील चकतीवरचा घनभार यांचा परिणाम होऊन ज्या विद्युतलहरी तयार होतात, त्याच अॅम्प्लीफायरकडे वा दुसऱ्या साधनाकडे पाठवल्या जातात. कंप पावण्याच्या क्षमतेनुसार या लहरींत फरक पडतो. या फरकामुळेच या लहरी जेव्हा लाऊडस्पीकरला पुरवल्या जातात तेव्हा पुन्हा जशीच्या तशी कंपने होऊन मूळ आवाजाबरहुकूम स्वर ऐकू येतात._

     _मायक्रोफोनचे अनेक आकार व प्रकार बघायला मिळतात. आपल्या नेहमीच्या परिचयाचा म्हणजे वक्त्याच्या समोर स्टँडवर उभा केलेला. याखेरीज हल्ली गायक हातात घेऊन गाणी म्हणतात, तो एक सुटसुटीत प्रकार आढळतोच. तिसरा प्रकार म्हणजे कॉलर माइक. वक्त्याच्या कॉलरलाच हा माईक अडकवलेला असतो. जेमतेम गुंडाच्या आकाराचा हा माईक वापरल्याने वक्ता येरझारा घालत सहज बोलू शकतो. याशिवाय दूरचित्रवाणी किंवा तत्सम कारणासाठी वक्त्यांच्या गळ्यात, कपड्यात लपेल, असाही छोटा माईक घातला जातो. हा माईक दिसत नाही, पण बोलणे मात्र आपल्याला ऐकू येते. कॉलरमाइकचीच ही सुधारित आवृत्ती. नाटकांसाठी वापरले जाणारे माईक हे अत्यंत संवेदनक्षम असतात. क्रिकेट मॅचमध्ये फलंदाजाच्या मागे स्टंम्पखाली वा स्टॅम्पमध्ये असेच माइक बसवण्याची पद्धत हल्ली वापरली जाते. या दोन्ही प्रकारांमध्ये हे माइक सहज दहा फुटांपर्यंतचा बारीकसारीक आवाज टिपू शकतात. त्यामुळेच नाटकातील पात्रे कुठेही असली, तरी त्यांचा आवाज सुस्पष्ट ऐकू येऊ शकतो किंवा फलंदाजाच्या बॅटला लागलेला चेंडूचा आवाजही दूरचित्रवाणीवरून आपण घरी ऐकू शकतो._

     _याखेरीज माईकचा नवीन प्रकार सध्या आपल्या देशातही वापरात येऊ लागला आहे. या प्रकाराचे नाव कॉर्डलेस माइक किंवा बग. यातील लहरींचे रूपांतर रेडिओलहरींमध्ये केले जाते. या रेडिओलहरी अॅम्प्लीफायरमध्ये नेमक्या पकडल्या जातात. या प्रकारच्या माईकला कसल्याही वायरची गरज नसते. हा माईक पाठवत असलेले संदेश पकडणारी यंत्रणा मात्र रेडिओलहरी पोहोचतील एवढ्या अंतरात लागते. कॉर्डलेस टेलिफोनचा माईक पण याच पद्धतीने काम करतो. ज्या वेळी गुप्तहेर या प्रकारचा माईक वापरतात, त्यावेळी त्याचा आकार अगदी लहान, न सापडणारा असल्याने त्याला बग म्हणतात. एखाद्या फुलदाणीतील फुलांमध्ये कोचाच्या तळाशी भिंतीवरील घड्याळामागेही तो लपवला जातो. महागडे पण शक्तिशाली उपकरण जेव्हा वापरले जाते तेव्हा या प्रकाराला 'बगिंग' असे म्हणतात थोडक्यात म्हणजे एखादा किडा ,ढेकूण जसा नकळत आपल्या आसपास वावरतो अगदी तेच यातून व्यक्त करायचे असते._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_सृष्टी विज्ञानगाथा विज्ञान व दिनविशेष मधून_*

कशास काय म्हणतात,

 ⭐⭐


💁‍♀️कशास काय म्हणतात 


जगाचे छप्पर – तिबेट

7 बेटयांचे शहर – मुंबई

सूर्यास्ताचा देश – इंग्लंड

5 नद्यांचा प्रदेश – पंजाब

धान्यांचे कोठार – प्रेअरीज प्रदेश

लवंगाची भूमी – मादागास्कर

पाचुंचे बेट – श्रीलंका

चीनचे दुख:श्रु – हो हॅंग हो नदी

7 टेकड्यांचे शहर – रोम

पूर्वेकडील व्हेनिस – कोची

निळा पर्वत – निलगिरी

नाईलची देणगी – इजिप्त

पवित्र भूमी – पॅलेस्टाईन

युरोपचे क्रीडांगण – स्वित्झरलॅंड

व्हाईट सिटी – बेलग्रेड

यंपायर्स सिटी – न्यूयार्क

भूमध्य समुद्राची किल्ली – जिब्राल्टर

भारताचे प्रवेशद्वार – मुंबई 

युरोपचा सुरुंग – बाल्कन प्रदेश

इंग्लंडचे उद्यान – पेठ

सुवर्णमंदिराचे शहर – अमृतसर

मैफल वृक्षांचा देश – कॅनडा

काळे खंड – आफ्रिका

बर्फाची भूमी – कॅनडा

युरोपचे रणक्षेत्र – बेल्जियम

गुलाबी शहर – जयपूर

राजवाड्यांचे शहर – कलकत्ता

पांढऱ्या हत्तीचा प्रदेश – सयाम

दुर्लक्षित शहर – ल्हॉसा

मोटार गाड्यांचे शहर – डेट्राईट

हजार सरोवरांचा प्रदेश – फिनलँड

उगवत्या सूर्याचा देश – जपान

मध्यरात्रीचा सूर्य – नार्वे

सोनेरी प्रवेश द्वाराचे शहर – सनफ्रान्सिस्को

गोऱ्या माणसाचे थडगे – गिनीचा किनारा

जगाचे साखरेचे कोठार – क्युबा

दक्षिण गोलार्धातील इंग्लंड – न्यूझीलंड

कंगारुंचा देश – ऑस्ट्रेलिया

अरबी समुद्राची राणी – कोची

युरोपचे गव्हाचे कोठार – युक्रेन

आसामचे अश्रु – ब्रह्मपुत्रा नदी

उत्तरेकडील व्हेमिस – स्टॉक होम


 💁‍♀️ जगातील पहिले व सर्वात मोठे 


पहिले अवकाशस्थानक – सॅल्युट – 1 ( रशिया )


पहिले अंतराळयान – स्पुटनीक – 1 (1957)


भारताला भेट देणारा पहिला युरोपीयन – मार्को पोलो


जगातील पहिली महिला पंतप्रधान – सिरीमाओ भंडारनायके


दक्षिण ध्रुवाला भेट देणारा पहिला वीर – अमुंडसेन


भारताला भेट देणारे पहिले अमेरिकन अध्यक्ष – आयसेन हॉवर


अंतराळात जाणारा पहिला सजीव -लायका नावाची कुत्री


चंद्रावर जाणारे पहिले अमेरिकन अवकाशयान (मानवसाहित) – आपोलो – 11


जगातील समुद्र प्रदक्षिण करणारा पहिला व्यक्ती – फर्डिनांड  मॅगेलन


अवकाशात पहिले उपग्रह सोडणारे पहिले राष्ट्र – रशिया


अमिरिकेने पाठविलेले पहिले उपग्रह – एक्सप्लोरर


भारताला भेट देणारे पहिले ब्रिटिश पंतप्रधान – हेरॉल्ड मॅकमिलन


पहिला अवकाशवीर – युरी गागारीन ( रशिया 12 एप्रिल 1969)


जगातील दुसरा व पहिला आफ्रिकन अंतराळ पर्यटक – मार्क शटलवर्थ  


पहिला अंतराळ पर्यटक – डेनिस टिटो (अमेरिका)



भारताला भेट देणारा पहिला चिनी प्रवासी – फहियान


सागरमार्गे भारतात येणारा पहिला प्रवासी – वास्को-द-गामा


पहिली महिला अवकाशवीर – वेलेन्टिना तेरस्कोव्हा (रशिया) 16 जुन 1963


भारताला भेट देणारे पहिले रशियन पंतप्रधान – निकोलन बुल्गानीन


अंतराळात स्पेस वॉक करणारा पहिला व्यक्ती – अलेक्सी लिओनाव


भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपीयन – सिकंदर 


जगातील पहिली महिला राष्ट्राध्यक्ष – मादिया एस्टेला पेरॉन (अर्जेन्टीना)


जिब्रास्टरची खाडी पोहून जाणारी पहिली महिला – आरती प्रधान (भारत)


चंद्रावर पाऊल टेकवणारा पहिला मानव – नील आर्मस्ट्रॉंग (20 जुलै 1969


जगातील सर्वात खोल सरोवर – बैकल सरोवर ( सैबेरिया)


जगातील सर्वात खोल महासागर – पॅसिफिक महासागर


भारतातील पहिला अवकाशवीर – राकेश शर्मा


भारतातील पहिली महिला अवकाशवीर – कल्पना चावला


जगातील सर्वात मोठे बेट – ग्रीनलँड


जगातील सर्वात उंच टॉवर – पेट्रोनॉल टॉवर (मलेशिया)


जगातील सर्वात उंच प्राणी – जिराफ


जगातील सर्वात मोठी घंटा – महान घंटा ( मॉस्को)


एवरेस्ट शिखर प्रथम सर करणारा – तेनसिंग नोर्के


जगातील सर्वात उंच शिखर – माऊंट एवरेस्ट (8852 मी.)


जगातील सर्वात मोठे वाळवंट – सहारा(आफ्रिका)


जगातील सर्वात उंच तळे – टिटिकाका


जगातील सर्वात मोठा लोकशाहीचा देश – भारत


जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना – भारत


जगातील सर्वात उंच धरण – भाक्रा नांगल (740)


अमेरिकेचा पहिला अवकाशवीर – अॅलन शेफार्ड


अमेरिकेची पहिली अवकाशवीर – सॅली राईट


जगातील सर्वात उंच पार्क – एलोस्टोना नॅशनल पार्क (अमेरिका)


एवरेस्ट दोनदा काबील करणारा – नावांग गोम्बू


एवरेस्टवर पाऊल ठेवणारा पहिला अंध – व्हेनेसायर


जगातील सर्वात उंच पठारी प्रदेश – पामीरचे पठार (तिबेट)


प्राणवायू शिवाय प्रथम एवरेस्ट वर जाणारा – फू-दोरजी


एवरेस्टवर पाऊल ठेवणारे पहिले दांपत्य – आंद्रेज व मारिना स्टेम्फेलजी


एवरेस्ट वर पाऊल ठेवणारी पहिली महिला – जुंको तोबेई 


जपानमधील पहिला अवकाशवीर – मामोरु मोहरी


जपानमधील पहिली अवकाशवीर – चिआकी मुकाई


जगातील सर्वात मोठा बेटांचा समूह – इंडोनेशिया


जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश – चीन


जगातील सर्वात मोठे बंदर – सिडने


जगातील सर्वात मोठी खाडी – हडसन बे ( कॅनडा)


जगातील सर्वात मोठा धबधबा – एन्जल (व्हेनेझुएला)


जगातील सर्वात मोठा पक्षी – शहामृग


जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन – ग्रँड सेंट्रल टर्मिनल (न्युयार्क)


जगातील सर्वात मोठे शहर – शांघाय (चीन)


जगातील सर्वात मोठा खंड – आशिया


जगातील सर्वात मोठा राजवाडा – व्हॅटीकन पॅलेस


जगातील सर्वात मोठे आखात – मारोक्कोचे आखात


जगातील सर्वात मोठा महासागर – पॅसिफिक


जगातील सर्वात मोठी मशीद – जामा मशीद,दिल्ली


जगातील क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात मोठा देश – रशिया


जगातील सर्वात मोठे ग्रंथालय – लायब्ररी ऑफ कॉंग्रस,वॉशिंगटन


जगातील सर्वात मोठे हॉटेल – रोशिया मास्को


जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश – सुंदरबन


जगातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर – लेक सुपिरिअर


जगातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर – कॅस्पियन समुद्र

⭐गजानन गोपेवाड ⭐

       

जादुई चौरसांच्या ईतिहास

 *_🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬_*


          🤔 *_कुतूहल_* 🤔


🎯 *_जादूई चौरसांचा इतिहास_*

***************************

_‘जादूचे बेरीज चौरस’ या संकल्पनेबाबत चिनी संस्कृतीतील आख्यायिका अशी : इ.स.पूर्व काळात यलो नदीच्या पुरामुळे विवंचनेत असलेल्या राजा यू लिंगला पाठीवर १ ते ९ ठिपक्यांची रांगोळी असलेले शुभशकुनी कासव दिसले. सहज चाळा म्हणून त्याने अंकांची बेरीज केली. गंमत म्हणजे, तिन्ही स्तंभ, तिन्ही रांगा आणि दोन्ही कर्ण यांतल्या अंकांची बेरीज १५ अशी होती. या चौरसाला त्याने ‘लो-शू’ (नदीवरचे भूर्जपत्र) असे नाव दिले. मात्र इसवी सन पूर्व काळातीलच चीनच्या फू-ही यांच्याकडे जादूच्या चौरसांच्या शोधाचे जनकत्व जाते. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील ‘दा-दाई-लिजी’ या पुस्तकात जादूच्या चौरसांचा उल्लेख आढळतो. या चौरसांचा प्रवास चीनमधून भारत, अरब देश, युरोप, जपान असा झाला असावा._

     _भारतात इसवी सनाच्या पहिल्या शतकात ४ x ४ चा बेरीज चौरस नागार्जुन यांनी बनवलेला आढळतो. खजुराहोच्या पार्श्वनाथ मंदिरातल्या शिलालेखातील चौरस (बेरीज ३४) जगप्रसिद्ध आहे. वराहमिहिरांच्या ‘बृहत्संहिते’मध्ये, तर वृंद यांच्या ‘सिद्धयोग’ ग्रंथात यांचा उपयोग आढळतो. परंतु भारतात गणिताच्या पुस्तकात जादूच्या चौरसांच्या रीती देण्याचे श्रेय ठक्कुरा फेरू (इ.स. १३१५) यांना जाते. नारायण पंडितांनी ‘गणितकौमुदी’ ग्रंथात (इ.स. १३५६) जादूच्या चौरसांचे अभ्यासपूर्ण विवेचन करताना अंकगणिती श्रेढी आणि जादूचा चौरस यांमधला संबंधही मांडला._

     _अरब देशांमध्ये नवव्या-दहाव्या शतकात गणिताच्या माध्यमातून हे चौरस जन्मकुंडल्या बनविण्यासाठी उगम पावले. पुढे इस्लामी गणितींनी यांची नियमावलीच तयार केली. युरोपमध्ये चौदाव्या शतकात मॉस्कोप्युलसने ४ ७ ४ जादूचा चौरस बनवण्याची सोपी युक्ती शोधली. पुढे जर्मन डॉ. कॉर्नेलिअस अग्रिप्पा यांनी ग्रहांशी संबंध असलेले सात चौरस बनवले. सन १५१४ मध्ये शिल्पकार अलब्रेख्त ड्यूररने ‘मेलॅन्कोलिया’ या जगप्रसिद्ध शिल्पात ४ ७ ४ बेरजेचा चौरस कोरला. सन १७३६ मध्ये बेंजामिन फ्रँकलिन यांनी १६ ७ १६ चौरस निर्माण केला. १९ व्या शतकात फ्रॉस्ट या ब्रिटिश मिशनऱ्याने एका चौरसाला ‘नाशिक चौरस’ असे नाव दिले. विसाव्या शतकात ली सालो यांनी बरेच मनोरंजक चौरस तयार केले. हेन्री डुडेनी यांनी १ खेरीज इतर मूळ संख्या घेऊन सर्वात कमी १११ बेरजेचा चौरस तयार केला._

     _सध्याही मोठ्या प्रमाणावर संशोधन होत असलेल्या या जादूई चौरसांचे जनमानसावर गारूड होते आणि ते कायम राहील._


🖊 *_नीलिमा मोकाशी_*

office@mavipamumbai.org

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

 *_📡 जय विज्ञान 🔬_*

*_दैनिक लोकसत्ता,दिनांक- १५ मार्च २०२१_*

घसा का बसतो, ?

 *_आजची माहिती_*


*_📙घसा का बसतो?📙_*

**********************


_आधी शिंका येतात, मग नाक गळते, घसा खवखवतो, खोकला येतो, घसा दुखतो व तापही येतो. असे तुम्हालाही याच क्रमाने बऱ्याचदा झाले असेल. यालाच आपण सर्दी-पडसे म्हणतो. विषाणूंच्या संसर्गान सुरुवातीला सर्दी-पडसे होते. त्यानंतर पेशींची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने जिवाणूंचा संसर्ग होतो व बसा खवखवणे, ताप अशी लक्षणे दिसतात. जिवाणूंच्या दुष्परिणामामुळे घशाला सूज येते. साहजिकच गिळायला वास होतो, गिळताना दुखते. जिवाणूंचा संसर्ग जेव्हा स्वरयंत्रापर्यंत जाऊन पोहोचतो, तेव्हा तेथेही सूज येते. स्वरतंतूवरहीं (Vocal Cords) परिणाम होतो._

     _आवाज निर्माण होण्यासाठी स्वरतंतू, स्वरयंत्र, घसा, जीभ हे सर्व निरोगी अवस्थेत असणे आवश्यक असते. जिवाणू संसर्गाने त्यांच्यावर सूज येते व साहजिकच आवाज बदलतो._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*

_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून_

संप्रेरके वा हार्मोन्स म्हणजे काय?

 *_आजची माहिती_*


📙 *_संप्रेरके वा हार्मोन्स म्हणजे काय ?_* 📙

*************************************

_शरीरात अनेक ग्रंथी असतात. काही ग्रंथींचा स्राव नलिकेद्वारे बाहेर सोडला जातो. (जसे अश्रु निर्माण करणारी ग्रंथी) तर काहींचा स्राव मात्र रक्तात सोडला जातो. दुसर्‍या प्रकारच्या ग्रंथींना अंत:स्रावी ग्रंथी असे म्हणतात. या ग्रंथींच्या स्रावावर मज्जासंस्था व रक्तातील रासायनिक घडामोडी यांचे नियंत्रण अवलंबुन असते. अंत:स्रावी ग्रंथींमधुन संप्रेरके वा हार्मोन्स रक्तात सोडली जातात. त्यामुळे या संप्रेरकांचा परिणाम संपुर्ण शरीरभर दिसुन येतो. संप्रेरके म्हणजे विशिष्ट प्रकारचे कार्य करणारे रासायनिक पदार्थ होत. संप्रेरकाची रक्तातील पातळी ठराविक प्रमाणातच असावी लागते. अन्यथा शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होतात. काही संप्रेरकांविषयी आता माहिती घेऊ._

     _मेंदुतील पिट्युटरी ग्रंथीपासुन वाढीसाठी आवश्यक असलेला संप्रेरक रक्तात सोडला जातो. या संप्रेरकामुळे शरीराची वाढ होते, शिवाय इतर संप्रेरक ग्रंथीवर नियंत्रणही ठेवले जाते. गलग्रंथीतुन थायलाॅक्झीन नावाचे संप्रेरक तयार होते. हेही वाढीसाठी आवश्यक असते, तसेच ते शरीरातील रासायनिक घडामोडींवर नियंत्रण ठेवते. मुत्रपिंडावरील अॅड्रेनल ग्रंथीतुन स्टेराॅइड संप्रेरके तयार होतात. ही संप्रेरके रासायनिक घडामोडींवर नियंत्रण करतात व अचानक हालचालीसाठी शरीराला तयार करतात. स्वादुपिंडात तयार होणारे इन्सुलिन ग्लुकोजच्या ज्वलनासाठी तसेच रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असते. बीजांडातुन स्रवणार्‍या स्त्री व पुरुष संप्रेरकामुळे व्यक्तीत स्त्री व पुरुष याची विशिष्ट लक्षणे आढळुन येतात. यांच्या प्रभावाखालीच शुक्राणुंची निर्मिती होते. तसेच मासिक पाळीची सुरुवात होते. गर्भधारणेसाठीही ही संप्रेरके आवश्यक असतात. अशी अनंत महत्वाची कामे करणार्‍या या संप्रेरकांचे रक्तातील  प्रमाण खूपच अल्प म्हणजे १०० मि.ली.ला १ मि.ग्रॅ. १००० चा भाग वा त्याहूनही खूप कमी असते. त्यामुळे 'मूर्ती लहान, पण किर्ती महान' ही उक्ती संप्रेरकांना तंतोतंत लागू पडते._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*

_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून_

स्वासोच्छवास कसा चालतो

 *_आजची माहिती_*


📙 *_श्वासोच्छवास कसा चालतो ?_* 📙 

*********************************


_श्वासोच्छ्वास बंद झाला म्हणजे माणूस मरतो श्वास घेणे व तो सोडणे हे कार्य व्यक्ती जन्माला आल्यापासून मरेपर्यंत अव्याहतपणे चालू असते. श्वास घेतल्याने हवा नाकावाटे फुप्फुसात जाते. तेथे हवेतील प्राणवायू रक्तात मिसळला जातो व रक्तातील कार्बन डायऑक्साइड वायू हवेत सोडला जातो. याखेरीज पाण्याची वाफ, अल्कोहोलसारखे विषारी पदार्थ देखील हवेत टाकले जातात. श्वास सोडल्यावर ही हवा नाकावाटे बाहेर सोडली जाते._

     _श्वास घेताना छातीच्या खाली असलेल्या पडद्यावजा स्नायूने फुप्फुसे खालच्या बाजूला ओढली जातात. तसेच फासळ्यांच्या व मानेच्या स्नायूंमुळे ती बाजूंनी व वरच्या दिशेने ताणली जातात. त्यामुळे आतमध्ये दाब कमी होऊन नाकावाटे हवा फुप्फुसात ओढली जाते. तेथे श्वसनाचे कार्य पूर्ण झाल्यावर पडदा फुफ्फुसांना वर ढकलतो, तर फासळ्यांमधील स्नायू व मानेचे स्नायू फुप्फुसांवर दाब आणतात. त्यामुळे फुप्फुसातील हवा आतील दाब वाढल्याने नाकावाटे बाहेर सोडली जाते. रक्तातील प्राणवायू व कार्बन डायऑक्साईड वायूंच्या प्रमाणावर श्वसनाचे नियंत्रण होत असते. मेंदूतील श्वसनाचे केंद्र या क्रियांवर नियंत्रण करते. श्वसनावर काही प्रमाणात ऐच्छिक नियंत्रणही असते. त्यामुळेच आपण स्वतःहून श्वास काही काळ रोखून ठेऊ शकतो; पण कालांतराने स्वयंप्रेरित नियंत्रणाच्या आधारे श्वसन आपोआप चालु होते. पडद्याचे वर खाली होणे जन्माला येण्याच्या क्षणापासून अखेरपर्यंत चालू राहते !सात मिनिटांच्या वर श्वासोच्छ्वास बंद पडल्याने व्यक्ती मरण पावते._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*

_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून_

पिकावरील किटक नाशकांची फवारणी

 *_☘ फवारणिचे महत्व ☘_*


*_🍇🐓🍅🐄🌾🥦🍉🐛🌶🦗🌹_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

_जमिनिमध्ये कितीही प्रमुख द्रव्ये (N P K) दुय्यम अन्नद्रव्ये (ca, mg, s) आणि सुक्ष्म अन्नद्रव्ये (Fe, Zn, Mn, Cl, Mo, Cu, B) घातली असली  तरी त्यांच्या परस्परातील स्पर्धा आंतरक्रिया (inter action) घडत असतात. उदा. नायट्रोजन वाढवले तर कलशियमची कमतरता होते. फास्फरस वाढविले तर झिंक, लोह याची कमतरता होते. बोरोन, मोलिब्डेन यांचे प्रमाण थोड़े जरी जास्त झाले तरी अनिष्ट परिणाम होतो. अशा गुंतागुंतीमुळे जमिनीत भरपूर खते देऊनसुध्दा ती लागू होत नाहित. त्यात जमीनी आसिडिक व अल्कलाईन असल्या तर समस्या वाढतात. ऊसाची संख्या मिळत नाही. अशा परिस्थितीत ही प्रमुख अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये, सुक्ष्म अन्नद्रव्ये फवारणीद्वारे दिली तर फार चांगला परिणाम होतो._

     _ऊसाच्या कांड्याची संख्या, पेराची जाड़ी, लांबी वाढविली आणि फुटवे मरण्याचे प्रमाण कमी केले तर टनेज चांगले वाढू शकते. फ़वारणीद्वारे पोषन द्रव्याची पुर्तता करण्याबरोबरच त्या सोबत संजिवके दिली तर हे काम अपेक्षे प्रमाणे घडू शकते. जिबरेलिन या संजिवकामुळे कांड्याची लांबी, संख्या वाढते. इंडोलब्युटेरिक आसिड( IBA ) किंवा ( NAA ) मुळे लांबी, जाडीसुध्दा वाढते. सायटोकायनिन (सिक्स बीए) मुळे जाडी, संख्या वाढते. ट्रायकंटेनाल मुळे सगळी पोषण द्रव्ये, संजिवाके यांचा प्रभाव वाढतो. जिबरेलिन आणि सिक्स बीएच्या मिश्रणाला 'प्रोमालिन' म्हणतात. प्रोमालिन व अन्नद्रव्याच्या मिश्रणाच्या फवारणीमुळे जमिनीत घातलेल्या अन्नद्रव्यांचे जलद शोषण होते. फोटोसिंथेसिस वाढते. आयबीए व सिक्स बीएच्या मिश्रणाच्या फवारणीमुळे मुळाकडून शेंडयाकडे अन्नद्रव्य व पाणी यांचे वहन करुन नेणाऱ्या नलिका (झायलेम) आणि पानातले तयार झालेले अन्न शरीरात सर्वत्र पोचविणार्या नलिका (फ्लोएम) चांगल्या बांदल्या जातात. भुद्रावन (soil solution) वेगाने खेचले जाते. मुळ्यांची वाढ चांगली होते. काण्ड्याची संख्या, जाड़ी, लांबी, चांगली वाढते. रिकव्हरी वाढते._

संकलन ::गजानन गोपेवाड 

*✳️🌀✳️🌀✳️🌀✳️🌀✳️🌀✳️*

अशा आहे शेळ्यांच्या जाती

 *_🐏अशा आहेत शेळ्यांच्या जाती🦙_*


*_🍇🐓🍅🐄🌾🥦🍉🐛🌶🦗🌹_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*


*_📌देशातील जाती_*


*_१) हिमालयीन पर्वत रांगा :_* _(जम्मू-काश्मीडर, हिमाचल प्रदेश आणि उत्तरांचल) जाती : गुड्डी, चेगू आणि चांगाथांगी इ._

*_२) उत्तर-पश्चिमविभाग :_* _(हरियाना, पंजाब, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाचे उत्तर पश्चिंम भाग) जाती : बिटाल, कच्छी, झालवाडी, सुरती, मेहसाणा, गोहिलवाडी, मारवाडी, सिरोही, जखराना, बारबरी, जमनापारी इ._

*_३) दक्षिण विभाग :_* _(महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्रप्रदेश आणि मध्य प्रदेशाचे काही भाग) जाती : उस्मानाबादी, कन्नी अडू, मलबारी, संगमनेरी इ._

*_४) पूर्व विभाग :_* _(बिहार, पश्चिम बंगाल, ओरिसा आणि भारताचा उत्तर-पूर्व विभाग) जाती : काळी बंगाली, गंजाम इ._


*_🎯आकारमानानुसार वर्गीकरण_*

*_१) मोठ्या आकाराच्या शेळ्या :_* _जमुनापारी, बिटाल, जखराना, झालवाडी, सिरोही इ._

*_२) मध्यम आकाराच्या शेळ्या :_* _मारवाडी, कच्छी, सुरती, बारबरी, मेहसाणा, गोहीलवाडी, कन्नीअडू, मलबारी, संगमनेरी, उस्मानाबादी, गंजाम, चांगाथांगी, चेगू आणि गुड्डी इ._

*_३) लहान आकाराची शेळी :_* _काळी बंगाली_


*_🔖शेळ्यांपासून मिळणाऱ्या उत्पादनानुसार शेळ्यांचे प्रकार_*


*_१) दूध व मांस (दुहेरी उद्देश) :_* _जखराना, जमुनापारी, बिटाल, झालवाडी, गोहीलवाडी, मेहसाणा, कच्छी, सिरोही, बारबरी, संगमनेरी, मारवाडी इ._

*_२) मांसोत्पादनासाठी :_* _काळी बंगाली, उस्मानाबादी, गंजाम, मलबारी, कन्नीअडू इ._

*_३) मांस व लोकर उत्पादनासाठी :_* _चांगाथांगी, चेगू, गुड्डी इ.राज्यांत संगमनेरी व उस्मानाबादी या जाती प्रचलित असल्या तरी खानदेशातील काठेवाडी, खानदेशी, कोकणातील कन्याळ, पाटण तालुक्याउतील कुई या जाती दूध व मांसासाठी उत्तम असूनही त्यांचे गुणधर्म निश्चिूत झालेले नाहीत. भारतात केल, खागणी, बिरारी, चोरखा, दख्खनी, जौनपुरी, कन्नी, वेलाडू, कोदीवली, मालकणगिरी, नागमेसेहिल, ओरिसा ब्राऊन, पंतजा, पर्बतसर, रामधन, शेखावती, शिंगारी यांसारख्या कितीतरी जाती दुर्लक्षित राहिल्या आहेत._


*_📣शेळ्यांची वैशिष्ट्ये_*

*_अ)_* _या जाती कोणत्याही प्रकारच्या हवामानात तग धरू शकतात._

*_ब)_* _मुख्य पिकांपासून मिळणाऱ्या उपप्रकारच्या उत्पादनावर शेळ्या सहजगत्या तग धरू शकतात._

*_क)_* _निकृष्ट प्रकारच्या खाद्याचे, गवताचे आणि अपारंपरिक खाद्याचे दूध, मांस आणि कातडीमध्ये रूपांतर उत्तम पद्धतीने करतात._

*_ड)_* _शेळ्या सेंद्रिय पद्धतीने पालनास उपयुक्त असून, सर्वसाधारण रोगांना सहजासहजी बळी पडत नाहीत._

*_इ)_* _शेळ्या दूरवर रानात, डोंगरकपाऱ्यांत चरण्यास जाऊ शकतात, तसेच कमीत कमी भांडवली गुंतवणुकीत व्यवस्थापन करणे सहज शक्ये असते. कोणत्याही वातावरणाशी समरस होण्याची नैसर्गिक क्षमता असल्यामुळे कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या निवाऱ्याची गरज नसते._

संकलन::गजानन गोपेवाड 

*✳️🌀✳️🌀✳️🌀✳️🌀✳️🌀✳️*

कुजने आणि सडने या दोघात फरक

 *_कुजणे आणि सडणे या दोन्हींत काय फरक आहे_* 


🌱🌱🌱👳‍♂👳🏻‍♂️👳‍♂🌱🌱🌱


*१)* _कुजणे हे चांगल्या सुक्ष्मजीवांचं काम आहे तर सडणे हे वाईट सुक्ष्मजीवांचं_

*२)* _ऑक्सिजन उपलब्ध असला तरच कुजण्याची प्रक्रिया घडते, तर ऑक्सिजन उपलब्ध नसल्यास सडण्याची प्रक्रिया घडते._


_मुळं श्वसन करत असतात. ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायॉक्साईड सोडतात. माती जर घट्ट असेल तर अशा वेळी मातीत कार्बन डायॉक्साईड साचत जाईल. परिणामी मुळं घुसमटून मरतील. म्हणूनच माती भुसभुशीत ठेवण्याकडे आपला कल असावा. नैसर्गिकरित्या हे काम गांडुळं व सूक्ष्मजीव करत असतात._


*_कोणत्याही झाडाला फुलं येण्याची मुख्य कारणे_*

_◆झाड मरेल असे वाटते तेव्हा_

_◆झाडात अन्नाचा भरपूर व समतोल साठा असेल तेव्हा ( म्हणजेच झाडात पुरेसे कर्ब असल्यावर)_


_याचा अर्थ असा की फुलं येण्यासाठी जास्त औषधं फवारून आपण झाडाला आतून खिळखिळे बनवत असतो. त्याऐवजी जर त्याला आपण योग्य प्रमाणात अन्न देण्यावर भर दिला तर झाडाचं आयुष्यमान वाढण्यात मदत होईल._


 _♦️बालपणात (अगदी लहान असताना) झाडाची वाढ जमिनीखाली होत असते. मुळं तयार होतात. साहजिकच खोड व पान यांच्या वाढीकडे झाड त्या काळात दुर्लक्ष करत असतं. म्हणूनच बालपणाच्या काळात पानांची वाढ नाही म्हणून चिंता करायची नसते. तेव्हा पानं कमीच येतात आणि खोडही छोटे असते._

*➖➖➖♦️♦️➖➖➖*

संकलन गजानन गोपेवाड 

जादु बेरीज चौरसाची

 *_🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬_*

           *_🤔 कुतूहल 🤔_*


🎯 *_निर्मिती जादूच्या बेरीज चौरसांची_*

*********************************


_या लेखात जादूचे बेरीज चौरस बनविण्याच्या खास रीती पाहूया. प्रथम पाहू विषम घरांचे जादूचे चौरस, उदा. ३७३ चौरस बनविण्याची पायरी पद्धत, जिला सायमन द ला लुबेरे पद्धत असेही नाव आहे._

     _प्रथम आपण क्रमवार १ ते ९ नैसर्गिक संख्यांचा जादूचा चौरस तयार करू. याकरिता मधला अंक ५ घ्यावा. सर्वांत लहान संख्या १ मधल्या स्तंभाच्या वरच्या घरात भरा. नंतर उजवीकडे वर जाणारा तिरका बाण वापरावा. १ च्या उजवीकडे वर जाणारा बाण तिसऱ्या स्तंभाच्या वर जातो, म्हणून तिसऱ्या स्तंभातील शेवटच्या घरात २ भरा. पुन्हा खालून उजवीकडे गेल्यास बाण दुसऱ्या रांगेत जातो म्हणून त्याच दुसऱ्या ओळीत शेवटच्या घरात ३ भरा. त्यापुढचा बाण १ ने भरलेल्या घरात जाईल म्हणून ४ ही संख्या ३ च्या खालच्या घरात भरा. अशा रीतीने बाकीचे अंक आकृती १ मध्ये दाखवलेल्या बाणांच्या दिशांप्रमाणे भरा. (स्वामी भारतीकृष्ण तीर्थजी यांच्या वैदिक गणितात या पद्धतीसाठी ‘परावत्र्य योजयेत्’ असे सूत्र आहे.) समान फरक असलेल्या कोणत्याही ९ परिमेय संख्या घेऊनही असा चौरस बनवता येईल. काही चौरस लगतच्या दोन संख्यांमध्ये समान फरक नसूनही तयार होतात. १५,१६,१७,२२,२३,२४,_


*_२९,३०,३१ या नऊ संख्या घेऊन जादूचा चौरस बनवता येतो का पाहा._*

_सम घरांचे जादूचे चौरस उदाहरणार्थ, ४७४ चौरस करण्याची कॉन्स्टॅन्टिनोपलच्या मॉस्कोपुलस यांची सुधारित सोपी पुढील रीत लोकप्रिय आहे._

     _१ ते १६ संख्या क्रमाने घेऊन एक चौरस (आकृती २-अ) दिला आहे. या चौरसातला मुख्य चौरस आणि मधला चौरस यांच्या कर्णांच्या टोकांशी असलेल्या संख्यांची फक्त अदलाबदल करावयाची इतकेच!  कसे ते बाणांच्या साहाय्याने दाखवले आहे. (आकृती २-ब) आता आपल्याला ३४ बेरजेचा जादूचा चौरस मिळेल. (आकृती २-क) याशिवाय ठिपक्यांच्या रांगोळीची पद्धत, बुद्धिबळातील घोडा, उंट, हत्ती यांच्या चालींचे मिश्रण करून केलेली पद्धत, भारतीय ठक्कुरा फेरू यांची अनोखी मनोरंजक पद्धत अशा कितीतरी पद्धती आहेत._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

 *_📡 जय विज्ञान 🔬_*

*_दैनिक लोकसत्ता,दिनांक- १६ मार्च २०२१_*

शरीराला दुखापत झाल्याने सुज का येतो?

 *_आजची माहिती_*


*_📙शरीराला दुखापत झाल्यास सूज का येते📙_*

****************************************


_खेळताना तुम्ही पडता. कधी कधी डोक्यावर काहीतरी आपटते. कधी मारामारीत हातापायाला लागते. कालांतराने लक्षात येते की ज्या ठिकाणी लागले आहे तेथे सूज आलेली असते. त्या भागाला हात लावला तर गरम लागते. त्या जागी दुखते, त्या भागात हालचाली व्यवस्थित करता येत नाहीत व ती जागा लालसर होते. त्यालाच इन्फ्लेमेशन किंवा दाह असे म्हणतात. लॅटिन 'इन्फ्लॅमेर' 'जळणे' या शब्दांपासून इन्फ्लॅमेशन हा शब्द आला आहे. कोणत्याही उतींना (पेशींचा समूह) इजा झाली, तर शरीर एका विशिष्ट पद्धतीने प्रतिसाद देते. यात उतींमधील पेशी, रक्तवाहिन्या, रक्तातील पेशी या सर्वांच्या एकत्रित सुसंघटित क्रियांमुळे झालेली इजा भरून येण्यासाठी मदत होते._

     _जखम व इजा झालेल्या ठिकाणच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात व त्या भागातील रक्तपुरवठा वाढतो. परिणामी तो भाग लालसर दिसतो व तेथील तापमानही वाढते. प्रसरण पावलेल्या रक्तवाहिन्यांच्या आवरणातून रक्तातील द्रव, प्रथिने व पांढऱ्या पेशी जखम झालेल्या ठिकाणी सोडल्या जातात. त्यामुळे त्या भागात सूज येते. जखम झाल्यावर त्या भागातील पेशीतून बाहेर पडलेल्या रासायनिक पदार्थाच्या क्रियेमुळे तसेच सूज आल्याने त्या भागाच्या उतींवर येणार्या दाबामुळे वेदना होतात. सूज आल्याने व वेदना होत असल्याने त्या भागाच्या हालचाली आपोआपच कमी केल्या जातात._

     _जखम व मार सोडून जीवाणू, विषाणू संसर्ग तसेच जंतूंनी शरीरात सोडलेल्या विषांच्या परिणामामुळेही दाहाची प्रक्रिया होते. अॅलर्जीमुळे तसेच उष्णता, थंडी अशा गोष्टींमुळेही दाह होतो. दाह होणे ही शरीराची संरक्षक अशी प्रतिसादात्मक क्रिया आहे. दाहाच्या प्रक्रियेत जंतूंचा नायनाट केला जातो. मृतपेशींचे पचन केले जाते व जखम भरून येण्याला मदत होते. जखम झाल्यावर सूज का येते, हे तुमच्या लक्षात आले असेलच._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित_*

_यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून_

गेआँर्ग ओहम

 *_🎧आजचे शास्त्रज्ञ 🎧_*


*_गेऑर्ग झिमॉन ओहम_*


*_बव्हेरियन-जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ_*


*_जन्मदिन - मार्च १६, इ.स. १७८९_*

****************************

_गेऑर्ग झिमॉन ओम[१] (आंग्लीकरणातून उद्भवलेला मराठी नामभेद: जॉर्ज सायमन ओह्म ; जर्मन: Georg Simon Ohm) (मार्च १६, इ.स. १७८९ - जुलै ६, इ.स. १८५४) हा बव्हेरियन-जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ होता. याने शाळेत शिक्षकी पेशा करताना अलेस्सांद्रो व्होल्टा या इटालियन आविष्कारकाने बनवलेल्या विद्युतरासायनिक घटावर अधिक संशोधन करण्यास आरंभ केला. या संशोधनातून घडवलेल्या स्वनिर्मित उपकरणाद्वारे याने संवाहकाच्या दोन टोकांतील विभवांतर आणि संवाहकातून वाहणारी विद्युतधारा यांच्यामधील परस्परसंबंध सिद्ध केला. हा संबंध "ओमचा नियम" म्हणून प्रसिद्ध आहे._


*_ओमचा नियम_*

_संवाहकाच्या दोन टोकांत वाहणारी विद्युतधारा, त्या दोन टोकांमधील विभवांतराच्या समानुपाती असते._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड


_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_सृष्टी विज्ञानगाथा विज्ञान व दिनविशेष मधून_*

लाय डिटेक्टर

 *_आजची माहिती_*


📙 *_लाय डिटेक्टर_* 📙

********************


_नेहमीच्या जीवनात सकारण वा अकारण अनेकदा आपण खोटे बोलत असतो. काहीतरी दडवण्यासाठीही हे खोटेपण असते. पण दडवादडवी करताना मनावर एक प्रकारचा ताण असतोच. छोटेसे उदाहरण घ्या. गृहपाठ झाला नाही म्हणून शिक्षक रागावताना म्हणतात, 'टीव्हीवर सिनेमा बघितला असेल, म्हणून वेळ झाला नाही,' सिनेमा तर बघितलेला असतो, म्हणूनच वेळही झालेला असतो. पण हे कबूल करायला मात्र मन राजी होत नाही. मग उत्तर येते, 'नाही नाही घरी मला काम होते म्हणून गृहपाठ झाला नाही'. हे उत्तर देताना कुठेतरी हातपाय थरथरतात, डोळ्याला डोळा भिडणे चुकवले जाते, एखादाच खोल श्वास घेतला जातो. क्वचित हृदयाचा एखादा ठोकाही चुकतो._

     _या होणाऱ्या बारीकसारीक शारीरिक बदलांची जाणीव बोलणाऱ्याला असते; पण बघणाऱ्याला होतेच, असे मात्र नाही. ही जाणीव सहज करून देणारे यंत्र म्हणजे लाय डिटेक्टर. या यंत्राचा शोध खरे म्हणजे फार पूर्वी म्हणजे १९२१ सालीच लागला. जॉन लार्सन यांनी अमेरिकेत हा शोध लावला. त्याला पॉलिग्राफ अशी तांत्रिक संज्ञा दिली जाते. वर्गात खोटे बोलणे, घरी फसवाफसवी करणे हे एक वेळ क्षम्य आहे; पण जर एखादा गुन्हेगार गंभीर गुन्हा करूनही कबुली द्यायचा नाकारत असेल, तर ? कोणीही साक्षीदार नसेल, तर यावेळी पॉलिग्राफ मशीन वापरण्याची सोय आहे. गुन्हेगार व साक्षीदाराच्या शारीरिक बदलांची कॉन्टॅक्ट लीडद्वारे पूर्ण नोंद करून हे यंत्र तो खरे बोलत आहे वा खोटे, याचा निवाडा करते. कायदेशीरदृष्ट्या या यंत्राचा निर्णय काही देशात पूर्ण प्रमाण मानला जातो, तर काही देशांत तो सहाय्यभूत मानला जातो._

     _श्वसनाचा वेग, नाडीचे ठोके, रक्तदाब, त्वचेवरील येणारे घर्मबिंदू, जीभ कोरडी पडणे, अंगावरचे केस उभे राहणे, हातापायांना कंप, दृष्टीची स्थिरता अशा कित्येक गोष्टींची नोंद हे यंत्र करते व मग हा निर्णय दिला जातो. अर्थात अत्यंत निर्ढावलेला गुन्हेगार किंवा पूर्ण प्रशिक्षित तरबेज गुप्तहेर या चाचणीतूनही सहज सुटू शकतो. हे शास्त्रज्ञांनाही मान्य आहे. पण ही दोन्ही उदाहरणे फारच क्वचित सापडतात; कारण निर्ढावलेला गुन्हेगार हा ज्ञात असतो व गुप्तहेराच्या स्वरूपाचा पत्ता आधीच लागलेला असतो._

     _लाय डिटेक्टरचा भारतात वापर अजून सरसकट केला जात नाही. ही यंत्रे आपल्या देशात थोडीच आहेत, हेही त्याचे महत्त्वाचे कारण आहे. 'सच का सामना' या रिअॅलिटी शोसाठी २००९ साली टीव्हीवर या मशिनचा सर्रास वापर आपण पाहिला आहे._

*~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_संकलन : गजानन गोपेवाड _*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_सृष्टी विज्ञानगाथा विज्ञान व दिनविशेष मधून_*

7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन

 [4/7, 3:18 PM] मंगेश मांडोले आर्णी, यवतमाळ: *_आज_*


*_विश्व आरोग्य (स्वास्थ्य) संस्था_*


*_📒जागतिक आरोग्य दिन 📒_*


*_स्थापना - ७ एप्रिल, इ.स. १९४८_*

****************************


_जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 1948 साली झाली असली तरी त्याच्या जवळपास शंभर वर्ष आधीपासूनच वेगवेगळ्या देशांनी आरोग्याच्या मुद्द्यांवर एकत्र येण्यास सुरुवात केली होती. 1851 साली पॅरिसमध्ये पहिल्या इंटरनॅशनल सॅनिटरी कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलं होतं. 1938 पर्यंत या कॉन्फरन्सची चौदा अधिवेशनं झाली._


_त्यावेळी जगासमोरची मोठी आव्हानं होती कॉलरा, प्लेग आणि यलो फिव्हर. या साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी 1892 आणि 1903 मध्ये करार झाले. आजच्या आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांची पाळंमुळं या करारांमध्ये सापडतात. गेल्या सात दशकांत सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रातील सुधारणांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचाही वाटा आहे. कुठल्याही नव्या आजाराची माहिती मिळवणं आणि ती लोकांपर्यंत पोहोचवणं, आजारांच्या साथी पसरत असतील तर त्याविषयी देशांना सावध करणं, लस आणि उपचारांविषयी संशोधन, आरोग्यासाठी निधी जमा करणं आणि तो गरज असेल तिथे पोहोचवणं अशी कामं ही संघटना करते._


_WHOच्या प्रयत्नांमुळे देवी रोगाचं उच्चाटन, पोलियो सारख्या रोगांवर नियंत्रण शक्य झालं. इबोलावरची लस तयार करण्यातही WHOनं महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या HIV-एड्स, इबोला, मलेरिया, टीबी अशा संसर्गजन्य आजारांबरोबरच, कॅन्सर आणि हृदयविकार तसंच पोषक आहार, अन्नसुरक्षा, मानसिक आरोग्य, नशामुक्ती अशा क्षेत्रांतही WHO काम करते आहे. विविध देशांबरोबरच खासगी देणगीदारांनी दिलेल्या पैशातून या संघटनेचं काम चालतं. स्वित्झर्लंडच्या जीनिव्हामध्ये या जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे._


_संयुक्त राष्ट्रांचे सदस्य असलेले सर्व देश या संघटनेचे सदस्य आहेत. पण मग त्या देशांचं काय, जे संयुक्त राष्ट्रांचे सदस्य नाहीत?_

    *_७ एप्रिल - जागतिक आरोग्य दिन_*

********************************


७ एप्रिल हा जागतिक आरोग्य संघटनेचा स्थापना दिवस. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ही जागतिक संस्था मराठीत ‘जागतिक आरोग्य संस्था’ या नावाने ओळखली जाते. ७ एप्रिल १९४८ रोजी स्वित्झर्लंडलंड मधील जिनेव्हा येथे ही संस्था स्थापन झाली. म्हणून हा दिवस "जागतिक आरोग्य दिवस" म्हणून जगभरात साजरा केला जातो. ही संस्था आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात सुसंवादाचे कार्य करणारी संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. आंतरराष्ट्रीय आरोग्य क्षेत्रात दिशादर्शक ठरणे, जागतिक स्तरावरील महत्वाच्या आरोग्य विषयक संस्थांमध्ये समन्वय राखणे, त्यांचे व्यवस्थापन करणे, जागतिक आरोग्य सेवा बळकट करणे, नैसर्गिक आपत्कालीन काळात पिडीतांना आवश्यक ती मदत करणे, जागतिक स्तरावर पोषण, निवारा, स्वच्छता, मनोरंजन, पर्यावरण स्वच्छता आदी गोष्टींना प्रोत्साहन देवून आवश्यक ते सहकार्य करणे, जागतिक स्तरावर आरोग्य विषयक नियमावली, करार आणि नियम मांडणे यांसारखी महत्त्वाची कार्ये ही जागतिक आरोग्य संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवर करीत असते.


*जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने -*


आपण दैनंदिन जीवनात आपल्या आरोग्याची किती काळजी घेतो; याचा आज आपण विचार करायलाच हवा, अर्थात आजच्या या पोस्टमध्ये काही महत्त्वाच्या टिप्स या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने सांगण्याचा प्रयत्न करतोय.


●आपले आरोग्य टिकविण्यासाठी आपण शुध्द (गावराणी- अर्थात शक्य असेल तरच) अन्न-पदार्थ खाण्यावर भर द्यावा. म्हणजेच आजच्या या रासायनिक अन्न प्रणालीतही आपण सेंद्रिय अन्न खाण्याचा प्रयत्न करा.

●जे खाल ते घरगुती आणि ताजे खा.

●ब्रेड-बिस्कीट पासून ते तेल, गहू, तांदूळ यांच्या packing वरही expiry date पाहिल्याशिवाय खरेदी करु नका.

●मिठाई सारखे पदार्थ फक्त २४ तासांच्या आत खायचे असतात. मिठाईचे पदार्थ विकत घेतांना भेसळयुक्त मावा वापरणाऱ्या दुकानांवरुन घेण्यापेक्षा (अशी शंका असणाऱ्या दुकानांवरुन) Quality जपणाऱ्या दुकानांवरुनच मिठाईची खरेदी व्हावी.

●मिठाई सुध्दा जर नजरेला ओलसर व मऊ दिसली तरच घ्यावी कारण जूनाट मिठाई ओलसर व मऊ न दिसता कडकपणा दर्शविणारी आणि मिठाई एकसंध न दिसता भेगाळलेली असते.

●चायनीजचे पदार्थ आजकाल जास्त आवडीने खाल्ले जातात. या चायनीज पदार्थांमध्ये "अजिनोमोटो" हा मीठ किंवा साखरेसारखा दिसणारा स्फटिकी पदार्थ अतिप्रमाणात चायनीज फूडस् च्या सेंटर्सवर वापरला जातो, म्हणून चायनीज फूडस् सेंटर्सवर आपण अजिनामोटो टाकला जावूच नये याबाबतीत आग्रही रहा अथवा असे पदार्थ घरीच बनविलेले अधिक योग्य असतात.

●भाजीपाला खरेदी करतांनाही मिठाई खरेदी बाबत करतांना जी काळजी घेतात तशीच घ्यावी लागते.

●भाजीपाल्याच्या नुसत्या अवस्थेवरुनही ताजा आणि जून भाजीपाला केवळ नजरेने ओळखता येतो.

●मात्र खासकरुन फळभाजी घेतांना उदा. गवार, वांगी, कारले, गिलके-दोडके (शिरोळे-घोसाळे) अथवा इतर यांची नेहेमीप्रमाणे जी उंची असते त्यापेक्षा अधिक उंचीचे दिसल्यास रासायनिक औषधे वा इंजेक्शन्स देवून त्यांना अत्यंत कमी कालावधीत भयानक वाढ देण्यात आलेली आहे हे निश्चितच समजावे. अशा अधिक प्रमाणातील रासायनिक पदार्थ वापरुन भाज्यांची केलेली कृत्रिम वाढसुध्दा आरोग्यास अत्यंत अपायकारक असते.

●सर्व प्रकारच्या भेसळयुक्त पदार्थांना टाळण्यासाठी, विविध अन्न-पदार्थांमध्ये कोणत्या पदार्थाची भेसळ असू शकते व ही भेसळ कशी ओळखावी या बाबत माहिती प्रत्येकाने घ्यायलाच हवी.

●कुठल्याही प्रकारच्या अन्न-पदार्थांमध्ये भेसळ असल्याची शंका आल्यास स्थानिक अन्न व औषधी भेसळ प्रतिबंधक कार्यालयाकडे त्वरीत तक्रार नोंदवावी.

●आता हे सर्व quality and fresh food बद्दल झाले. आरोग्याचा विषय इथेच थांबत नाही तर आरोग्यासाठी नियमितपणे व्यायाम, मैदानी खेळ, योगासने, योगाभ्यास आदि आवश्यक आहेच.

●शारिरीक, घराची व परिसराची स्वच्छता ही तेवढीच गरजेची आहे.

●शारिरीक तंदुरुस्तीसोबतच मानसिक आरोग्य जपणे आवश्यक आहे



 ********************************

*_०७ एप्रिल - जगातील पहिली काडेपेटी_*

********************************


७ एप्रिल १८२७


आजच्याच दिवशी १८२७ साली बाजारात आली जगातील पहिली काडेपेटी.


इवलीशी काडेपेटी आली कुठून माहितीय का? अग्नी पेटवण्यासाठी चकमक वापरण्याच्या किचकट मार्गातून सुटका करायला जॉन वॉकर या ब्रिटिश शास्त्रज्ञानं काड्यापेटीचा शोध लावला. माचिस बाजारात आली त्याला आज तब्बल १९२ वर्षं झाली. या मेणाच्या पृष्ठभागावर घासुन ज्वाला निर्माण करणारी काडेपेटी जॉन वॉकरने तयार केली, अन ७ एप्रिल १८२७ ला पहिली काडेपेटी जगाच्या बाजारात आली. दैनंदिन जीवनात गरजेची ठरलेल्या काडीपेटीचा जगभर वेगानं प्रसार झाला. आजही बहुतेकांच्या किचन ओट्यावर ती हाताशीच ठेवलेली असते. ८० च्या दशकात काडेपेटीच्या वैविध्यपूर्ण कव्हर्सचा संग्रह करायचा अनेक जणांना नाद होता. त्यातीलच एक मुलुंडच्या सज्जनवाडीत राहणाऱ्या नंदकुमार देशपांडे यांनी गेल्या ४० वर्षांपासून हा छंद जोपासलाय. त्यांनी निरनिराळ्या प्रकारच्या तब्बल सहा हजार काडेपेट्या जमवल्यात. त्यात आपल्याकडच्या सर्वात जुन्या 'अनिल' ब्रॅण्डसोबतच अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सचिन तेंडुलकर, अझरुद्दीन, श्रीदेवी यांची चित्र असलेल्या वैशिष्ठयपूर्ण माचिस आहेत. 


स्वीडन, इंडोनेशिया, पाकिस्तान, चीन, जपान, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रिया या देशातल्या त्रिकोणी, चौकोनी, आयताकृती अन लिपस्टिक, बॅटरी सेलच्या आकाराच्याही काडेपेट्या त्यांच्या संग्रहात आहेत. त्यातल्या रिकाम्या काड्यांतून आयफेल टॉवरची प्रतिकृती उभारून एका प्रदर्शनात त्यांनी लक्ष वेधून घेतलं होतं. आपल्याकडं शिवकाशीला काडेपेटी उत्पादनाचाही मोठा उद्योग आहे. केरळातल्या कोचि मध्येही हे कारखाने आहेत. हजारो लोकांचं पोट या उद्योगावर अवलंबून आहे. अलीकडच्या काही वर्षांत गॅस लायटर्सचं प्रस्थ बरंच वाढलं. धुम्रपानविरोधी मोहीम जगभर सुरू झालीय. त्याचा परिणाम काडेपेटी उद्योगांवर झालाय. वार्षिक तब्बल दीड हजार कोटींची उलाढाल असलेल्या या उद्योगात दहा वर्षांत पंचवीस टक्क्यांनी घट झालीय. माचीस बनवणारे ८ हजार कारखाने बंद पडलेत. पूर्वी आपण पाकिस्तान आणि आफ्रिकेतही माचिस निर्यात करायचो. आता पाकिस्तानमध्ये हा उद्योग सुरू झालाय. त्यांच्या स्वस्त दरामुळं आफ्रिकन देश त्यांच्याकडून काडेपेट्या आयात करतात.


आपल्याकडं 'विमको' ही काडेपेटी उत्पादन करणारी प्रमुख कंपनी. त्यांचे एम, आय नो, होम लाईट, शिप हे माचीस ब्रँड सर्वांनीच कधी ना कधी हाताळलेत यात शंकाच नाही.

संकलन गजानन गोपेवाड 





संदर्भ : इंटरनेट


********************************

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...