══════════════════════
@ संकलन
गजानन गोपेवाड
══════════════════════
🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎
══════════════════════
📒 *केस कुरळे का होतात ?* 📒
******************************
आपले केस केरटीन या प्रथिनाचे बनलेले असतात. त्यातले काही सरळसोट का राहतात, तर इतर वेडीवाकडी वळणे घेत कुरळे का बनतात, याचं इंगीत प्रथिनांच्या रचनेतच सामवले आहे. प्रथिने ही अमिनो आम्लांची बहुवारिक साखळीच असते. प्रथिनांमध्ये एकूण २० वेगवेगळ्या प्रकारची अमिनो आम्ल असतात. त्यातल्या प्रत्येकाच्या रेणूची अंतर्गत तसंच त्रिमिती रचना वेगवेगळी असली तरी प्रत्येक अमिनो आम्लाच्या एका टोकाला आम्लधर्मीय कार्बोक्सील हा रेणूंचा गट असतो, तर दुसर्या टोकाला अल्कलीधर्मीय अमिनो गट असतो. साखळी गुंफण्यासाठी जेव्हा एका अमिनो आम्लाचा रेणू शेजारच्या दुसर्या अमिनो आम्लाशी जोडला जातो तेव्हा हे अमिनो आणि कार्बोक्सील रेणू एकमेकांशी पेप्टाइड बंध तयार करतात. अशा रीतीने प्रथिनांची प्राथमिक रचना असणारी हि सरळसोट साखळी तयार होते.
या अमिनो आम्लांवर इतर अणुही असतात. ते टोकाला नसून मधल्या अंगाच्या दोन्ही बाजूंना पसरलेले असतात. ते जराशा दूरवर असलेल्या अमिनो आम्लावरच्या दुसर्या रेणूशी संधान बांधून इतर बंध तयार करतात. त्यामुळे मग या साखळ्या सरळसुत न राहता त्यांच्यामध्ये वेटोळी किंवा मोड तयार होतात. प्रथिनांची द्वितीय स्तरावरची रचना तयार होऊ लागते.
या प्रकारच्या बंधामध्ये सल्फरचे अणुही सहभागी होतात. कित्येक अमिनो अम्लांच्या मध्यभागावर सल्फरचे अणु असतात. त्यांचा संपर्क दुसर्या कोणत्यातरी साखळीत त्यांच्यापासून दूरवर असणाऱ्या अमिनो आम्लाच्या अंगावरच्या सल्फरच्याच अणुशी आला, कि त्यांच्यामध्ये एक पूल तयार होतो. त्याला डायसल्फाईड ब्रिज असे म्हणतात. या पुलांमुळे मग त्या प्रथिनांच्या सरळ असलेल्या साखळीला बाक येतो. त्याची वेटोळी बनतात. केसांमध्ये अशा सल्फरच्या पुलांची संख्या वाढली तर ते कुरळे होतात. जर त्यांची संख्या कमी झाली तर ते सरळ राहतात. केसांमध्ये किती पाणी आहे, यावरही त्यांच्या या रचनेत काही बदल होतात; पण ते कायमचे नसतात. केस कोरडे झाले कि परत आपले मूळ रूप धारण करतात.
काही जण केसांवर काही प्रक्रिया करून त्याचे स्वरूप बदलू पाहतात. सरळ केस असलेली व्यक्ती आपले केस कुरळे करून घेते. तसे करताना ती त्यांच्यातल्या सल्फर पुलांची संख्या वाढवत असते; पण हि स्थिती तात्पुरतीच असते. कारण नव्याने वाढलेले केस परत सरळच राहतात. कालांतराने मग सरळ वळण देण्याच्या प्रयत्नांची होते. काही दिवसांनी ते आपले मुळचे कुरळेपण परत मिरवू लागतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा