══════════════════════
@ संकलन @गजानन गोपेवाड
══════════════════════
🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎
══════════════════════
📒 *तेल का तरंगतं ?*
**************************
प्रत्येक पदार्थाच्या रेणूंवर काही विद्युतभार असतात. एकापेक्षा अधिक अणू एकत्र येऊन जेव्हा रेणु तयार होतात तेव्हा त्या अणूंमधील ऋणविद्युतभारधारी इलेक्ट्रॉनच्या सहभागातून त्या अणुंमधले रासायनिक बंध तयार होतात. आयनिक बंधांमध्ये अशा इलेक्ट्राॅनची देवाणघेवाण होते. त्यामुळे मग जो अणू इलेक्ट्रॉनचं दान करतो त्याच्यावर धनविद्युतभार तयार होतो, तर जो अणू इलेक्ट्रॉन स्वीकारतो त्याच्यावर ऋणविद्युतभार तयार होतो. सहसंयोगी किंवा कोव्हॅलंट बंधामध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण न होता दोन अणुंमध्ये त्यांची भागीदारी होते. कोणत्या प्रकारचे बंध तयार झाले आहेत त्यावरून मग त्या रेणूवरील एकंदरीत विद्युतभाराचं स्वरुप ठरतं. सहसा आयनिक बंध असलेल्या रेणूंमध्ये दोन टोकाला विरुद्ध प्रकारचे विद्युतभार असतात. त्यामुळे ते रेणू जणू दोन धृव असल्यासारखे वागतात. एका ध्रुवावर धनविद्युतभार असतो तर दुसऱ्या धृवावर त्याच्या विरुद्ध ॠणविद्युतभार. अशा रेणूंना ध्रुवीय रेणू म्हणतात. पाण्याचा रेणू या प्रकारात मोडतो.
सहसंयोगी बंध असलेल्या रेणूंमध्ये विद्युतभाराचं असं ध्रुवीकरण होत नाही. तो रेणुच्या सर्वच भागांवर सारखाच विभागलेला असतो. बहुतेक सेंद्रिय पदार्थांचे रेणू या प्रकारचे असतात. तेल हा एक सेंद्रिय पदार्थ असल्याने त्याचे रेणुही याच प्रकारात मोडतात.
जेव्हा दोन पदार्थ एकमेकांमध्ये मिसळले जातात तेव्हा ध्रुवीय रेणू असलेले पदार्थ एकमेकांकडे आकर्षिले जातात. कारण त्यांच्या एका ध्रुवावरचा धनविद्युतभार दुसऱ्या रेणूच्या दुसऱ्या ध्रुवावरच्या ऋणविद्युतभाराला आपल्याकडे खेचतो. असे रेणू वेगवेगळ्या पदार्थांचे असले तरी एकमेकांकडे खेचले जातात. एकमेकांमध्ये सहजगत्या मिसळून जातात पण जर एक पदार्थ धृवीय रेणूंचा असला आणि दुसरा तसा नसला तर मग ध्रुवीय पदार्थांचे रेणू खेचले जातात आणि दुसऱ्या पदार्थाला आपल्यापासून दूर लोटतात. पाणी आणि तेल जेव्हा एकत्र केलं जातं तेव्हा पाण्याचे ध्रुवीय रेणु एकमेकांना खेचून घेतात व आसपासातच त्यांचं संधान जुळतं. तेलाच्या रेणूंवरचा विद्युतभार सर्वत्र सारखाच विखुरलेला असल्याने ते पाण्याच्या रेणुकडे आकर्षित होत नाहीत. एकमेकांबरोबरच संधान बांधणे ते पसंत करतात. त्यामुळेच पाणी आणि तेल एकमेकांमध्ये मिसळत नाहीत. वेगवेगळेच राहतात.
त्यातही मग तेलाची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असल्याने ते पाण्यापेक्षा हलके असते. साहजिकच ते पाण्यावर तरंगते. त्या दोन पदार्थांची एकमेकांत सरमिसळ होत नसल्याने मग तरंगणाऱ्या तेलाचा तवंग वेगळा उठून दिसतो.
*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन*
═══════════════════════
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा