सोमवार, ३ जानेवारी, २०२२

आपल्या ला भुख का लागते


══════════════════════

  @ संकलन @गजानन गोपेवाड 

  

══════════════════════

            🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📙 *आपल्याला भूक का लागते ?* 📙 


आपलं शरीर सतत काम करत असतं. जेव्हा आपण विश्रांती घेत असतो किंवा झोपेत असतो तेव्हाही श्वसन, रक्ताभिसरण, हृदयाची धडधड यांसारख्या प्रक्रिया चालूच असतात. त्यामुळे शरीराला सतत ऊर्जेची गरज भासते. हिचा पुरवठा अखंड असण्यासाठी शरीराला वेळोवेळी पोषण मिळणं आवश्यक असतं. आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा हे पोषण मिळतं. ते साठवूनही ठेवलं जातं. पण तो साठा संपला की परत पोषक पदार्थ शरीराला मिळण्याची गरज असते. याचीच जाणीव आपल्याला करून देण्यासाठी भुक लागण्याची भावना निर्माण होते.


आपल्या मेंदूमधील हायपोथॅलॅमस या अवयवामध्ये भुकेवर नियंत्रण ठेवणारं केंद्र असतं. त्याला संदेश मिळाला की ते कार्यरत होतं आणि भुकेची भावना जागृत करतं. त्या केंद्राला मिळणारे संदेश विविध प्रकारचे असतात. त्यातले काही शरीराच्या आतून उत्पन्न होतात. म्हणजेच ते अंतर्गत असतात, तर काही बाहेरून येणारे असतात.


शरीराला ऊर्जा मिळते ते ग्लुकोजच्या ज्वलनातून. त्यामुळे रक्तात ग्लुकोजचं प्रमाण एका निर्धारित पातळीवर नेहमी राहील याची व्यवस्था केलेली असते. ते जर त्या पातळीपेक्षा फारच चढलं तर ते आरोग्याला बाधक असल्यानं इन्सुलीन या संप्रेरकाचा  पाझर सुरू होतो. ते संप्रेरक ग्लुकोजची निर्धारित पातळी राखण्यात मदत करतं. जर ग्लुकोजची पातळी या निर्धारित प्रमाणापेक्षा फारच घसरली तर तो संदेश मिळून भुकेचं केंद्र जागृत होतं. त्यावेळी आपण पुरेसं अन्न पोटात टाकलं तर मग भुक मिटल्याची भावनाही याच केंद्रातून निर्माण केली जाते.

आपल्या पोटाचं आकारमानही विशिष्ट पातळीवर ठेवण्याची व्यवस्था केली जाते. तसंच ते काही विविक्षित प्रमाणात भरलेलं असेल हेही बघितलं जातं. पोट जर रिकामं झालं तर ते आकुंचन पावून त्याचं आकारमान घटतं. भुकेचं केंद्र जागृत करायला तोही एक संदेश पुरतो. अशा वेळी पाणी पिऊन आकारमान वाढवलं तरीही भुक भागल्याची भावना निर्माण होते.


आज जरी आपल्याला हवं तेव्हा अन्न उपलब्ध होत असलं तरी आदिमानवाच्या काळात जेव्हा रानावनात कंदमुळे गोळा करून किंवा शिकार करून मनुष्यप्राणी आपली पोषणाची गरज भागवत होता. तेव्हा अन्न केव्हा मिळेल याची शाश्वती नव्हती. त्यामुळे असं ते मिळालं की प्रत्यक्ष पोषणाची आवश्यकता असो-नसो, त्याच्या दर्शनाने किंवा गंधानंही भुकेची भावना चाळवली जात असे. उत्क्रांतीच्या ओघात हा गुणधर्म टिकून राहिला आहे. त्यामुळे स्वादिष्ट अन्न दिसलं किंवा त्याचा दरवळ नाकपुड्यांना चाळवून गेला म्हणजेही आपल्याला भूक लागते.


*-डाॅ.बाळ फोंडके यांच्या'का?'या पुस्तकातुन* 

═══════════════════════

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...