══════════════════════
@ संकलन @
*श्री. गजानन गोपेवाड
══════════════════════
🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎
══════════════════════
📙 *दात आणि त्यांचे प्रकार* 📙
******************************
दात आहेत म्हणूनच चणे खाता येतात. दातांशिवाय जीवन कठीण असते. मानवाने कवळी शोधून काढली आहे किंवा अन्नपदार्थात बदल करून शिजवून तो खाऊ शकतो. पण अन्य प्राणी मात्र दात अधू झाल्यास, पडल्यास जिवालाच मुकतात. कारण एकच उपासमार.
दातांची ठेवण व शास्त्रीय माहिती अगदी पहिलीपासूनच दिली जाते. त्यातील काही मोजके उल्लेख म्हणजे दाताचा वरचा पांढरा भाग एनॅमल म्हणजे कवच हा शरीरातील सर्वात कठीण भाग असतो. यापेक्षा कठीण शरीरात अन्य काही नाही. त्याच्या आतील भाग म्हणजे हाडासारखाच डेटिंगचा भाग. हाही कठीणच असतो, पण त्यामध्येच रक्तवाहिन्यांचे जाळे व मज्जातंतू येऊन पोहोचतात. डेन्टिन जबडय़ाच्या हाडात खोलवर सिमेंटने पक्के बसलेले असते. दाताचा वर दिसणारा भाग हा जेमतेम असतो. हिरड्यांनी व हाडांनी झाकलेला भाग खाली खोलवर असतो.
दातांचा कवचाचा भाग कितीही कठीण असला तरीही त्यावर खाण्यातील पदार्थातून तयार होणाऱ्या अाम्ल पदार्थांचा परिणाम होतोच. साखर, तोंडात अडकून राहिलेले पिष्टमय पदार्थ यांवर लाळेचा परिणाम होऊन हे कवच हळूहळू खराब होते व तेथे दात किडू लागतो. हीच कीड पुढे खोलवर जाऊन डेन्टिनपर्यंत व नंतर दाताच्या मुळापर्यंत पोहचते. दाताला ठणका लागणे, गार गरम गोड पदार्थ न खाता येणे हे याच वेळी सुरू होते. दातांतील कीड काढून त्या जागी चांदी भरणे हे दंतवैद्य करतात व त्यामुळे दात काढून टाकावे लागणे वाचू शकते. दात दुखू लागण्याचा यात हे सर्व करणे योग्य ठरते.
माणसाला जन्मतः दात नसतात. पण सहाव्या महिन्यापासून दुधाचे म्हणजे पडणारे दात येऊ लागतात. सहाव्या वर्षांपर्यंत एकूण वीस दात आलेले असतात. प्रत्येक जबड्याचे दोन सारखे भाग केले तर दोन दाढा, एक सुळा व दोन पुढचे दात अशी पाचांची विभागणी होते. हे दात वयाच्या सात ते अकरा यादरम्यान पडून मग प्रत्येक बाजूला आठ दात अशी बत्तीशी पूर्ण होते. यामध्ये दोन दाढा, दोन उपदाढा, एक सुळा व दोन पुढचे दात अशी विभागणी होते. तिसरी दाढ अक्कल दाढ मात्र थोड्या सावकाशीने म्हणजे सोळा ते वीस वर्षादरम्यान उगवते.
वेडेवाकडे दात नीट करणे, कृत्रिम दात बसविणे, खराब दात नीट करून पुन्हा बसवणे, दातात चांदी भरणे, कवळी बनवणे यांसारखी अनेक प्रकारची उपचारपद्धती सध्या दंतवैद्य वापरतात. दात व हिरड्या यांच्या रोगामुळे संपूर्ण पचनसंस्थाच बिघडून आरोग्य कायमचे बिघडू शकते. यासाठी आवश्यक तेव्हा दातांवर उपचार करणे रास्त ठरते. दात दुखत असल्यास उपचार सगळेच करतात पण फक्त हे पुरेसे नसते. किडलेल्या दातांवरील उपचार पद्धतीत आता अनेक पद्धती वापरल्या जातात. दातांच्या मुळापर्यंत गेलेली कीड काढून ती पोकळी चांदीने भरली जाते. मोडक्या दातांवर टोपी (कॅप) बसवुन तो नव्यासारखा बनवला जातो. एक वा अनेक दातांच्या जागी हाडामध्ये स्क्रूचा आधार बसवुन त्यावर कृत्रिम दात बसवला जातो. याला 'इम्प्लांट पद्धती' असे म्हणतात. या पद्धतीत कवळीऐवजी कृत्रिम दातांची पक्की व्यवस्थित व्यवस्था केली जाते. दंतोपचारात आता विविध शाखांचा विस्तार झाला आहे.
मानवी दातांची ठेवण, जबड्यातून कृत्रिम दात यांचा शोध घेऊन अनेक गूढ गुपितेही उलगडली आहेत. मृतांची ओळख पटवणे, गुन्हेगार ओळखणे यांसाठी याचा उपयोग झाला आहे.
दातांचा वापर जितका करावा, तितकी त्यांची ताकद टिकते, ही एक विशेष गोष्ट आहे. दातांवरील कवच, दातांचा रक्तपुरवठा, हिरड्या यांना दातांच्या वापरातूनच पक्केपणा मिळत असतो. यामुळेच केवळ शिजवलेले अन्न व फळांचे रस घेण्यामुळे दात कमकुवत होऊ शकतात. कच्ची फळे, भाज्या, कोशिंबिरी व भरपूर चावावे लागणारे, चोथा असलेले पदार्थ खाल्ल्यास दात पक्के राहण्यास मदत होते. अर्थात दातांनी अतिकडक पदार्थ खाण्याचा अट्टाहास करून फायदा होतो, असा मात्र याचा अर्थ नाही.
शुभ्र, दाणेदार, सलग दंतपंक्ती असल्या तर ती व्यक्ती चारचौघांत नक्कीच उठून दिसते. केवळ चेहऱ्याचे सौंदर्य यासाठी असावे लागते, असे नव्हे. मुळचे दात कसे आहेत, ही बाब अलहिदा, पण दातांची निगा राखून आरोग्य मिळवणे हे तर सर्वांच्याच हाती आहे.
'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*
═══════════════════════
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा