══════════════════════
*📒📒📒 @ संकलन @📒📒📒*
*श्री. गजानन गोपेवाड *
══════════════════════
🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎
══════════════════════
📒 *तोंडाला दुर्गंधी का येते ?* 📒
*******************************
ही विकृती म्हणजे काही जिवाणूंची अवकृपा आहे. हवा नसतानाही ज्यांची वाढ होऊ शकते, अशा घ्या ऍनेरोबिक जातीच्या जीवाणूंच्या करणीपायी तोंडात काही सल्फरयुक्त संयुगांची निर्मिती होते. ही संयुगं सहजासहजी हवेत उडून जाऊ शकतात. म्हणजेच बाष्पनशील असतात. यातलं एक संयुग म्हणजे हायड्रोजन सल्फाईड हा वायू असतो. कुजक्या अंड्यांमधूनही हाच वायू बाहेर पडतो. तसंच मिथाईल मरकॅप्टन नावाचं दुसरं एक संयुगही या दुर्गंधीला कारणीभूत असतं.
काही कारणांनी जेव्हा आपलं तोंड कोरडं पडतं तेव्हा अशा जीवाणूंच्या वाढीला पोषक वातावरण तयार होतं. त्यात अशा प्रसंगी तोंडातल्या लाळेच्या स्रावालाही आहोटी लागते. लाळ आपल्या जिभेवरचा, एकंदरीतच तोंडातला ओलावा राखण्यास मदत करते. शिवाय लाळेमधलं लायसोझाईम नावाचं विकर जीवाणूंना मारून टाकतं व त्यांच्या वाढीला त्यामुळे आळा बसतो; पण लाळेचा पाझर आटला की या दोन्ही प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडत नाहीत. त्यामुळे या जीवाणूंचं फावतं. त्यांच्या करणीपायी तयार होणारी दुर्गंधीयुक्त रसायने तोंडात साचून राहतात.
आपल्या जीभेवरच्या वळकट्या, हिरड्यांच्या खालची जागा किंवा दातातल्या फटी या सहसा कोरड्या असतात. तसंच त्या थोड्याश्या अंधार्याही असतात. अशा जागी हे जिवाणु फोफावतात. त्यात जर दातांच्या फटीत अन्नाचे कण अडकून पडलेले असतील तर ते कुजतात. या जीवाणूंना ते पोषक ठरतात. त्यांच्या वाढीला मदतच करतात.
आपल्या आहाराचीही कधी कधी या जीवाणूंच्या वाढीला मदत होते. आहारातील काही पदार्थांच्या सेवनामुळे या ऍनेरोबिक जीवाणूंच्या वाढीला आणि बाष्पनशील आणि दुर्गंधीयुक्त संयुगांच्या निर्मितीला हातभार लावला जातो. कॉफी हा असाच एक पदार्थ आहे. त्याच्या अतिसेवनामुळे त्यातील आम्लधर्मीय पदार्थ तोंडातील ओलावा कमी करण्यास कारणीभूत होतात. वातावरण मग या दुर्गंधीकारक जीवाणूंच्या वाढीस योग्य होतं. शर्करायुक्त पदार्थ किंवा चुइंगमसारख्या पदार्थांचं जेव्हा या जिवाणूंकरवी विघटन होतं तेव्हाही ही बाष्पनशील संयुगं निर्माण केली जातात. मसालेदार पदार्थ किंवा कांदे खाल्ल्यावर त्यांच्या पचनापोटी निर्माण होणारे वायू रक्तामध्ये शोषले जाऊन उच्छवासाच्या वेळी फुप्फुसातून बाहेर फेकले जातात. त्या वेळीही तोंडातून दुर्गंधी आल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. अर्थात तो वास जरी काही जणांना सहन होत नसला तरी तो कुजक्या अंड्यासारखा नाक दाबून धरायला लावत नाही हे मात्र खरंच !
*-डॉ.बाळ फोंडके यांच्या 'का?'या पुस्तकातून*
═══════════════════════
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा