मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१

नद्या वळणाकार का घेतात


══════════════════════

   *📒📒📒 @ संकलन @📒📒📒*

  *श्री.गजानन गोपेवाड *

══════════════════════

               🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎

══════════════════════   

📒 *नद्या नागमोडी वळणका घेतात ?* 📒

***********************************

नद्यांचा उगम डोंगरराजीमध्ये म्हणजेच उंचावर होतो. तिथून त्या उताराकडे वाहत जातात. जोवर हा उतार असतो तोवर त्यातील उंचवटे आणि सखल भाग यांच्या साथीनं त्या वाह । राहतात; पण जेव्हा त्या सपाट प्रदेशातून वाहू लागतात तेव्हा त्यांचा प्रवाह निर्धारित करणारे दुसरेच घटक प्रबळ होतात. यातल्या दोन प्रमुख घटकांचा प्रभाव प्रवाहाचं स्वरूप निश्चित करण्यात होतो. नद्याच्या वाहण्यामुळं पाण्याचं काठावरच्या तशाच तळाशी असलेल्या मातीशी घर्षण होतं. त्यामुळे मग त्या मातीची धूप होते. उलट काठावरचा गाळ नद्यांच्या तळाशी साचून राहतो. नदीचा प्रवाह जरी सलग भासला तरी सर्वच पाणी एकाच वेगानं वाहत नसतं. याला परत तळामध्ये तसंच काठावरच्या प्रदेशातील उंचवटे आणि सखल भाग कारणीभूत असतात. ज्या बाजूचा प्रवाह वेगानं वाहतो त्या बाजूकडची धूप होण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे तो भाग अधिक खोल बनतो. त्या बाजूच्या पाण्याला अधिक वेग येतो. त्यापायी धूप आणखीच वाढते. उलट ज्या बाजूच्या प्रवाहाचा वेग कमी असतो त्या बाजूकडे गाळ साचून राहण्याचं प्रमाण वाढीस लागतं. त्या बाजूचा तळ उथळ होतो. प्रवाहाच्या वेगाला अधिक अटकाव होतो. तो आणखी कमी होतो. जास्त गाळ साचून राहू लागतो. अशा रीतीनं नदीच्या तळाचा उतार वाढला, की ज्या बाजूला जास्त उतार आहे त्या बाजूला प्रवाह वळतो.


 सायकलीवरून जाताना जर गुळगुळीत रस्त्याच्या बाजूला असलेल्या गवताळ भागात पुढचं चाक गेलं तर त्याचा वेग कमी होतो. सायकल त्या बाजूला झुकते, म्हणजेच दोन चाकांच्या वेगात फरक पडला, की सरळ वाट सायकल सोडून देते. तशातलीच नदीच्या प्रवाहाची गत होते. फरक इतकाच, की ज्या बाजूच्या प्रवाहाची गती जास्त झालेली असते त्या बाजूकडे प्रवाह झुकतो. कारण आता उतार त्या दिशेला वाढलेला असतो. तसा तो प्रवाह झुकला की विरुद्ध बाजूच्या पाण्याला तेवढ्याच वेळात जास्त अंतर काटावं लागतं. त्याचा वेग वाढतो. त्यापायी होणारी धूप वाढते. तशी ती वाढली की आता उताराची दिशाही बदलते. त्यामुळे मग प्रवाह विरुद्ध बाजूला झुकतो. वळण विरुद्ध बाजूकडे झुकतं. ज्या प्रदेशातून अशा वेळी नदी वाहत असते त्या प्रदेशात नैसर्गिक उतार नसल्यामुळे प्रवाहापोटी उद्भवणाऱ्या चढाव- उतारांमधील सततच्या दिशाबदलाची संगत करत नदी वाहत राहते. साहजिकच तिचा प्रवाह नागमोडी वळणं घेत राहतो.


*-डॉ.बाळ फोंडके यांच्या 'का?'या पुस्तकातून*

═══════════════════════


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...