════════════
@ संकलन @
*श्री. गजानन गोपेवाड
═════════════
🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎
═════════════
📙 *बेटांची श्रुंखला*
*******************
बेट म्हणजे मुख्य जमिनीपासून समुद्रामुळे बाजूला पडलेले भूभाग. मुख्य जमिनी म्हणजे प्रमुख खंडे. भारताची बेटे म्हणजे अंदमान व निकोबार. पण अंदमान किंवा निकोबार बेटे म्हणजे बेटांची एक श्रुंखला आहेत. काही प्रमुख बेटांवर वस्ती आहे, तर काही बेटे तशीच ओसाड आहेत. जगाच्या पाठीवर जवळपास हाच प्रकार आढळतो. बहुतेक ठिकाणी अशा श्रृंखला आढळतात. मग त्या भर समुद्रात असतील किंवा एखाद्या प्रमुख भूखंडाच्या जवळपास असतील. असे का व्हावे ?
याकरता थेट पुरातन काळाकडे वळावे लागते. पृथ्वीची मध्यभागापासून पृष्ठभागापर्यंतची विभागणी कोअर, मँटल व क्रस्ट अशा तीन आवरणात होते. सर्वसाधारणपणे क्रस्टची म्हणजे भूकवचाची जाडी बत्तीस ते पन्नास किलोमीटर असते. पण हीच जाडी समुद्रातळाशी जेमतेम तीन ते पाच किलोमीटर इतकी कमी होते. पृथ्वीचे मँटल किंवा मध्यावरण हे अतितप्त असते. येथील आण्विक घटकांचे विभाजन काही वेळा सुरू होते, तेव्हा समुद्रतळाशी असलेले भूकवच फोडून आतील तप्त लाव्हा बाहेर पडतो. पृथ्वीचा गाभा हा त्याहूनही तप्त असला, तरी तो प्रचंड गुरुत्वाकर्षणाच्या दाबाखाली अाकसलेला आहे. संपूर्ण पृथ्वीच्या भूकवचावर समुद्रातळाशी किमान एकशेवीस ठिकाणी अशी अतितप्त ठिकाणे भूगर्भशास्त्रज्ञांनी माहीत करून शोधून ठेवली आहेत.
खोल समुद्राच्या पोटात या अतितप्त ठिकाणी जेव्हा ज्वालामुखीचा लाव्हा उफाळून बाहेर पडू लागतो, तेव्हा तो अर्थातच थंड होऊन त्याची शिला बनू लागते. या प्रचंड शिलाखंडाचेच बेट बनते. असे हे नवनिर्मित बेट जेव्हा पाण्यावर दिसू लागते आणि पसरते, तेव्हा भूकवचाची जाडी वाढत जाते. समुद्रतळाशी असलेल्या अतितप्त ठिकाणाची गडबड मात्र थांबलेली नसते. ज्वालामुखी पूर्ण थंडावलेला नसतो. पण वरच्या तोंडावर मात्र भले मोठे झाकण बसून ते बंद झालेले असते. या सगळ्यांची गोळाबेरीज म्हणून समुद्रतळाशी असलेल्या भूकवचाची थोडीशी हालचाल होऊ लागते. ते पुढे सरकते. म्हणजेच नवीन बेटे तयार झालेला भाग पुढे गेल्यावर पुन्हा एकदा ज्वालामुखीचा उद्रेक सुरू होतो. या ठिकाणी पुन्हा एखादे बेट तयार होते, पण जोवर अंतर्भागाचा उद्रेक थंड होत नाही, तोवर ही प्रक्रिया चालूच राहते. आता आपण जी प्रक्रिया पाहिली, ही सर्वसाधारणपणे हजारो वर्षांच्या कालावधीत घडते व बेटांमधील अंतर पंचवीस ते पंचवीसशे किलोमीटर इतके असू शकते. अशा प्रकारच्या बेटमालिका वा बेटांच्या श्रृंखला जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी सापडतात.
एक विरोधाभासही यातील काही ठिकाणी सापडतो. समुद्राच्या खोलवर भागांतील बेटांचा पृष्ठभाग कंच हिरवागार असतो. पण क्वचित तेथेच एखादे ज्वालामुखीचे तोंड (क्रेटर) धूर ओकत असते.
विविध बेटांचा माणसाने काय उपयोग केला ? एकांडे शिलेदार तेथे वस्तीला गेले. काही ठिकाणी गुन्हेगारांना शिक्षा म्हणून पाठवले गेले. मोक्याच्या ठिकाणी बेटांवर लष्करी ठाणी वसवली जाऊन आसपासच्या चार पाचशे किलोमीटरवर देखरेख ठेवायला उपयोग केला गेला. ज्या बेटांवर मुबलक पाणी उपलब्ध झाले तेथील वस्तीच वाढत गेली. छोटे देश म्हणून ही बेटे उदयाला आली आहेत. मालदीव, मॉरिशस ही अशी काही उदाहरणे तर दिएगो गाॅर्सिया हे दक्षिण हिंदी महासागरातील एकमेव बेट लष्करीदृष्ट्या फार मोक्याचे ठरले आहे. साखलीन बेटमालिका ही पॅसिफिकमधील लष्करीदृष्ट्या महत्त्वाची बेटमालिका आहे.
*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*
════════════
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा