बुधवार, ९ मार्च, २०२२

गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳 ➿➿➿➿➿➿➿ *सीताराम पटवर्धन ऊर्फ आप्पासाहेब पटवर्धन*

 ➿➿➿➿➿➿➿

*🇮🇳🇮🇳गाथा बलिदानाची* 🇮🇳🇮🇳

➿➿➿➿➿➿➿


*सीताराम पटवर्धन ऊर्फ आप्पासाहेब पटवर्धन*

                                                                          *जन्म :  ४ नोव्हेंबर १८९४*

          (आगरगुळे-रत्नागिरी)                                                               *मृत्यू : १० मार्च १९७१*


     आप्पासाहेब पटवर्धन यांचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरीत झाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते पुण्यात आले. मुंबई विद्यापीठातून तत्त्वज्ञान विषयात एम.ए. केल्यावर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजात १९१७-१८ या काळात एक वर्ष प्राध्यापकी केली. तत्पूर्वी मुंबईत सन १९१६ मध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या वेळी आप्पासाहेबांना गांधीचे पहिल्यांदा दर्शन झाले होते. २१ वर्षांचे आप्पासाहेब गांधींचे विचार ऐकून इतके भारावून गेले की त्यांनी नोकरी सोडली आणि ते पूर्णकाळ समाजकार्य करण्यासाठी गांधींच्या आश्रमात दाखल झाले, आणि गांधीजींंचा पत्रव्यवहार सांभाळू लागले. याच काळात गांधींनी १९१९ साली सुरू केलेल्या 'यंग इंडिया' या साप्ताहिकाची, साबरमती आश्रमात चालू असलेल्या राष्ट्रीय शाळेत शिकवण्याची आणि शाळेच्या मुख्याध्यापकाच्या कामाची जबाबदारी आप्पासाहेब पटवर्धनांनी स्वीकारली.


अप्पासाहेब हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सुमारे साडेतीन वर्षें तुरुंगात होते. तुरुंगात भंगीकाम करण्यास मिळावे म्हणून त्यांनी केलेला सत्याग्रह गाजला.


पुढे आप्पा कोकणात आले. तेथे त्यांनी त्यांनी ‘कुणबी सेवा संघ’ काढला. ते ‘चरखा संघा’ चे तर अध्यक्षच झाले होते. त्यांनी रत्नागिरीत सूतकताई व ग्रामोद्योग प्रसाराचे बहुमोल काम केले. त्यांनीच जिल्ह्यात काँग्रेसची मुहूर्तमेढ रोवली. ते जिल्हा काँग्रसचे अध्यक्षही होते. दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यातील कणकवली शहरात आप्पासाहेब पटवर्धनांनी ‘गोपुरी आश्रम’ सुरू केला.


🔹 *गोपुरी संडास*

                            कणकवलीत 'गोपुरी आश्रम' चालवत असताना मानवी विष्‍ठेपासून सेंद्रिय खत तयार करणे हे काम त्यांनी सुरू केले. त्‍यांनी दोन्ही बाजूस दोन बादल्या बांधलेली एक कावड तयार केली होती. ती कावड खांद्यावर ठेवून ते कणकवली गावात जात. तेथे टोपल्यांच्‍या संडासांतील मानवी विष्‍ठा कावडीच्या बादल्यांत भरून गोपुरी आश्रमात आणत व त्यापासून खत बनवीत. या खताला त्यांनी सोनखत असे नाव दिले. अनेक वर्षे त्यांनी मानवी मैल्यापासून खत बनविण्याचेच कार्य केले. हे खत आश्रमातील भात, भाजीपाला व फळझाडे यांना दिले जाई, त्यामुळे पिकांचे उत्पादन वाढले. या संडासाच्या टाकीत साठलेल्या एका कुटुंबाच्या मलापासून वर्षांला साधारण १६०० रु. किंमतीच्या खताची निर्मिती होते.


मानवी विष्ठेपासून बनवलेल्या खताला आजही सोनखत म्हणतात.


मानवी विष्ठा जमा करण्यासाठी आप्पासाहेबांनी शास्त्रीय पद्धतीने जे संडास बांधले त्यांना गोपुरी संडास म्हणतात. त्यासाठी त्यांनी ३ फूट x ३ फूट x ३ फूट आकाराच्या दोन टाक्या बांधल्या. या टाक्या एकमेकांपासून अगदी थोड्या अंतरावर होत्या. दोन टाक्यांच्या वरच्या बाजूस मधोमध शौचविधी करण्यास दीड फूट लांब व नऊ इंच रुंद अशी पोकळ जागा, वर झाकण आणि त्यावर पायटे बसवले होते. शौचविधी झाल्यानंतर त्यावर माती टाकण्यात येई. असे केल्यानंतर सहा महिन्यांत त्यातून सेंद्रिय खत तयार होई. एक टाकी भरली, की दुसऱ्या टाकीचा उपयोग केला जाई.


♻ *चर्मोद्योग*

                      महारांनी मेलेल्या पशूची कातडी सोडवणे बंद केले, तेव्हा अप्पासाहेब पटवर्धनांनी मेलेल्या जनावरांची कातडी सोलणे, खतासाठी मांस आणि हाडे मिळवणे आदी कामांसाठी अनेक चर्मालये काढली. चर्मालयांत भाई सुखी, बाबा फारक, बाळूदादा पानवलकर, शामराव जोशी, बांदेकर, रमाकांत आर्तेकर हे त्यांचे पहिल्यापासूनचे सोबती होते. यांत अनेक ब्राह्मण सहकारी होते. हे सगळे स्वातंत्र्यसैनिक होते.


आप्पांचे अनुयायी रमाकांत आर्ते आणि पुष्पलता रमाकांत आर्ते यांनी देवरुखमध्ये चर्मकाम करण्याचे कार्य नेटाने चालवले आहे. (सन २००९ ची बातमी). या दांपत्याचे चिरंजीव युयुत्सु आर्ते व मिहीर आर्ते हे दोघेही उच्चशिक्षित तरुण आप्पांच्या व आपल्या आई-वडिलांच्या सामाजिक कार्यात मुख्य सहभागी आहेत.


आर्ते कुटुंबीय गेली कित्येक दशके देवरुखमध्ये चांभारकामाचे प्रशिक्षण देण्याचे कार्य करतात. वर्षांत ३५ ते ४० विद्यार्थी प्रशिक्षण घेतात.


⚛ *आप्पासाहेब पटवर्धनांचे अन्य यशस्वी उद्योग*                   

              आप्पांनी त्याकाळात सोलर, कुकर, पवनचक्की, गोबरगॅस प्लँट असे अपारंपरिक ऊर्जास्रोताचे यशस्वी प्रयोग केले. त्यांवर त्यांनी पुस्तकेही लिहिली.

ग्रामपंचायत राज ही संकल्पना अस्तित्वात यायच्या पूर्वी ग्रामपंचायतीच्याच धर्तीचे काम आप्पांनी गोपुरीत सुरू केले. त्यानुसार रस्ते, विहिरी, जलसंधारण, प्राथमिक शिक्षण आदी कामे होऊ लागली.  

🇮🇳🇮🇳🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳🇮🇳🇮🇳

🙏🙏🙏शुभ प्रभात🙏🙏🙏

संकलन -) गजानन गोपेवाड 

उमरखेड जिल्हा - यवतमाळ ४४५२०६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Featured Post

व्यायाम व योगा अवश्य करावा*

*व्यायाम व योगा अवश्य करावा*  *व्यायाम व योगा करण्याचे दहा फायदे:-*  1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते: व्यायाम करणारी...