═════════════
@ संकलन @
गजानन गोपेवाड
═════════════
🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎
═══════════
📙 *मध*
**************
मधाचा वापर कित्येक शतके केला जात आहे. गोडासाठी, औषधासाठी मध वापरला जातो. मध मधमाशा बनवतात, साठवतात त्या मुख्यत: त्यांच्या लहानग्यांसाठी. कडाक्याच्या थंडीत जेव्हा फुलेच नसतात, तेव्हा त्यांना मधाचा उपयोग होतो. खरे म्हणजे मध ही मधमाशांनी स्वतःकरता अडचणीच्या काळात वापरण्यासाठी निर्मिलेली वस्तू आहे. पण अन्य अनेक प्राणी त्याचा स्वतःकरता हुशारीने वापर करतात.
मध तयार कसा होतो, ते बघणे फार गमतीचे आहे. आपली कल्पना अशी असते की, मध फुलात असतो व तो गोळा करण्याचे काम फक्त मधमाशा करतात. फुलात जो मध असतो, त्याला टिकाऊ स्वरूप नसते. त्यात पाणी भरपूर असते. त्यातील साखरेचे स्वरूप वेगवेगळे असते. म्हणजे प्रत्येक फुलातील मधाची चव सातत्याने तीच असेल असे नव्हे. असा हा फुलातील मध (Nectar) मधमाशी गोळा करते. तेथून ही मधमाशी पोळ्याकडे परतते. येथे पोळ्यातील कामकरी माशी येणाऱ्या माशीच्या स्वागताला बाहेर डोकावते. तिच्याकडून आणलेला मध स्वतःच्या तोंडात घेते. मध साठवण्याची एक वेगळी छोटीशी ग्रंथी तिच्या शरीरात असते. मधाचे पोट असेच म्हणा ना. या पोटात मध गेला की त्याचे एका वितंचकाकडून पचन सुरू होते. अल्पकाळात पचन झालेल्या मधामध्ये असलेल्या विविध साखरेपासून फक्त एक प्रकारची साखर तयार झालेली असते. यापुढचे काम तसे किरकोळ असते. मधाच्या पोटातून हा मधाचा थेंब जिभेवर आणून त्याला हवेवर वाळवायचा म्हणजे नको असलेले पाणी हवेत जिरून जाते. ही क्रिया पोळ्याच्या अंगभूत उष्णतेमुळे झटकन पार पडते. आता आपल्याला ज्ञात असलेला घट्ट मद्य तयार झालेला असतो. पोळ्याच्या षटकोनी रचनेतील एका कोनाड्यात मग या मधाची साठवण होते. कोनाडा भरला गेला की, त्याला हलकेच पातळसर मेणाचे सील केले जाते. हे मेण मधमाशीच्या अंगातून स्रवते. त्यामुळे हा तयार मध टिकण्याचा, वाहून जाण्याचा, वाळवण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. ज्याप्रमाणे कोनाडे भरत जातील, त्याप्रमाणे पोळ्याचा आकार वाढू लागतो. एखाद्या वसंत ऋतूत मध्यम आकाराचे पोळे सहज पंधरा ते वीस किलो इतका मध साठवू शकते. मधाचा बाजारभाव बघितला, तर या मधमाश्यांनी केलेल्या अफाट मेहनतीची कल्पना येईल.
असा हा तयार मध ज्या जंगलात असेल, तेथील फुलांच्या जातीप्रमाणे विशिष्ट चव व गंधांचा बनतो. जांभूळ, कारवी, मोह, आंबा यांपासून मिळालेला मध खास चवीचा असतो. जाणकार त्यातील फरक सहज सांगू शकतात. अस्वले, माकडे, पांडा यांना मध आवडतो. पोळ्यावर हल्ला करून त्यातील मध खाणेही त्यांना जमते. याउलट तरस, कोल्हा, खारी पोळे चुकूनमाकून खाली जमिनीवर पडले तरच त्याचा फडशा पाडतात. मधाच्या जोडीला पूर्ण पोळ्याचाही पोटभरीसारखा उपयोग हे प्राणी करतात. माणूस प्रथम मधमाशा हाकलतो वा मारतो, मग मध काढतो व शेवटी त्या पोळ्यातून मेणही काढून घेतो.
मधमाशापालन करणारे ठरावीक काळाने फक्त पोळे काढून त्यातील मध सेंट्रीफ्युगल पद्धतीने फिरवून काढून घेतात. कोरड्या झालेल्या पोळ्यात साखरेची पेरणी करून पोळे जागेवर ठेवले जाते. मधमाशा उपाशी राहू नयेत, म्हणून साखरेची गरज असते.
मध घातलेला चहा छान लागतो. पोळीवर मध तर उत्तमच लागतो. मधाचा उपयोग औषध घेण्यासाठी अनुपान म्हणून म्हणजे औषधी गोळीचा परिणाम जास्त चांगला व्हावा म्हणूनही केला जातो. आयुर्वेदीय औषधी देण्यासाठी वैद्य नेहमीच मधाचा वापर सांगतात.
मधुमेह नसेल, तर एक चमचा मध व एक चमचा लोणी रोज सकाळी घेतल्यास तब्येत उत्तम राखली जाते, असाही एक समज आहे. दोन्ही पोषक द्रव्ये लक्षात घेतली तर नक्कीच त्यात तथ्य असावे.
*'सृष्टी विज्ञानगाथा' या